सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने येणाऱ्या चाकरमान्यांना चौदा दिवसांचा विलगीकरण कालावधी असावा. असा प्रस्ताव जिल्ह्यातील सरपंच संघटना व सरपंचांनी जिल्हाधिकारी यांच्या समोर ठेवला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने चाकरमानी येणार आहेत. त्यांना सक्तीचे चौदा दिवसांचे विलगीकरण असावे असे सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी म्हटले आहे.
हा प्रस्ताव बहुतेक सरपंचांना मान्य आहे. याशिवाय वैद्यकीय तपासणी अहवाल घेऊन येणाऱ्यांना तो कालावधी कमी असला तरी चालेल. असे बहुतेक सरपंचांचे म्हणणे आहे, असे देसाई यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांमध्ये विशेषत: करोना योद्धा म्हणून मुंबई येथे कार्यरत असणाऱ्यांना चौदा दिवस विलगीकरण कालावधी हा मोठा आहे .त्यामुळे तो सात दिवसांचा असावा, असे खासदार व पालकमंत्री यांनी म्हटले आहे.
मुंबईत परिसरामध्ये पोलीस, डॉक्टर व अन्य शासकीय सेवांमध्ये योद्धा म्हणून काम करणाऱ्यांना चौदा दिवसांचा अलगिकरण करण्याचा प्रस्ताव ठेवल्यास ते मुंबईत सेवा बजावून श्री गणेश चतुर्थी सणाला कसे काय येऊ शकतील? असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. मुंबई परिसरातील कोविडचे काम करणाऱ्यांचा देखील विचार केला जावा. असे पालकमंत्री यांनी म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे व एसटी बस सुविधा दिली जावी. अशी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर एसटी बसची सेवा उपलब्ध करून दिली जाईल. अशी शक्यता निर्माण झाली आहे . याबाबत एसटी विभाग चाचपणी करत असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे
गणेश चतुर्थीला येणाऱ्या चाकरमान्यांनी दि.५ ऑगस्टपर्यंत सिंधुदुर्गात यावे. असे सरपंच संघटना व सरपंच यांच्या बैठकीत ठरले असले तरी शासन पातळीवर पालकमंत्र्यांनी सात दिवसांचा अलगीकरण ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
शासनाची भूमिका आणि नियोजना बाबतीत सकारात्मक भुमिका लवकर घेतली जावी. असे आवाहन सिंधुदुर्ग सरपंच संघटना अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी केले आहे.