करोनाविरोधात लढ्यात राज्य सरकारने आणखी एक पाऊल टाकलं असून रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. प्रयोगशाळा, प्राणी आणि वैद्यकीय अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये आशादायक परिणाम मिळाला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. रेमडेसिवीर औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयानेही याआधी भारतात करोना रुग्णांवर रेमडेसिवीर औषधाची चाचणी केली जाणार असल्याचं सांगितलं होतं.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, “महाराष्ट्र शासन रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये यास आशादायक परिणाम मिळाला आहे, जोदेखील कोरोना व्हायरसमुळे होतो”. पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “जागतिक आरोग्य संघटना करोनाच्या उपचारात त्याचे काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात असं सुचवते. हे औषध अत्यंत महाग असून गरीब लोकांना देण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली आहे”.
या निर्णयाबद्दल बोलताना राजेश टोपे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, “मुंबईतील काही रुग्णांवर चाचणी केली असता प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं पहायला मिळालं. त्या रुग्णांनीच हे औषध खरेदी करुन आणलं होतं. सरकारनेही हे इंजेक्शन खरेदी केलं पाहिजे असं सांगितलं जात होतं. या औषधाने करोनाचे विषाणू नष्ट होतात अशी माहिती मला देण्यात आली आहे. हे औषध खूप महागडं आहे. गरिबांनाही ते उपलब्ध झालं पाहिजे यादृष्टीने १० हजार इंजेक्शन खरेदी करण्याचं ठरवलं आहे. पण हे औषध कोणाला द्यायचं, नाही द्यायचं याचा काही प्रोटोकॉल असतो. हे औषध आऊट ऑफ स्टॉक असतं. आपल्याकडे हे औषध उपलब्ध नाही. बांगलादेशकडून याची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा चांगला परिणाम होईल अशी आशा आहे”.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी याआधी करोनाविरोधातील लढ्यात जागतिक आरोग्य संघटना आणि भारताच्या एकत्रित प्रयोगाचा भाग म्हणून रेमडेसिवीर या औषधाची भारतात कोरोना रुग्णांवर चाचणी केली जाणार असल्याची माहिती दिली होती.