राज्यातील वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक नियमांचं पालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी यावेळी राजकीय पक्षांनीही गर्दी करणारी आंदोलनं, मोर्च काढू नयेत. माझ्यासह महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांनाही पक्ष वाढवायचा आहे. पण हे करताना करोना संसर्ग वाढणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
शरद पवार यांनी ट्विट करत आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करत असल्याची माहिती दिली आहे. ते म्हणालेत की, “करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसंच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत”.