करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागपुरात जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. २५ आणि २६ जुलै असे दोन दिवस हा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे संघर्षानंतर पहिल्यांदाच महापौर संदीप जोशी आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे एकत्र आल्याचं पहायला मिळालं. पत्रकारांशी बोलताना त्यांनी जनता कर्फ्यू जाहीर केला.
“उद्या आणि परवा दोन दिवस नागपूरमध्ये जनता कर्फ्यू जाहीर करण्यात येत आहे. नागरिकांनी स्वत: कर्फ्यू पाळावा. २७,२८,२९ आणि ३० तारखेला लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरुन आवाहन करणार आहेत. लॉकडाउन लावणं योग्य ठरणार नाही, त्यामुळे जनतेला आवाहन करणार आहोत,” अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.
“उद्या-परवा जनता कर्फ्यू असणार आहे, त्यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरु असतील, जनतेने हा कर्फ्यू पाळावा. लॉकडाउन करायची वेळ आली तर तो अत्यंत कडक असेल,” असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. “नागपूरमध्ये ३१ तारखेला पुन्हा बैठक घेऊन लॉकडाउनबाबत निर्णय घेणार आहोत,” असं त्यांनी सांगितलं आहे. “मेडिकल आणि दूध याशिवाय कोणी घराबाहेर पडू नये,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, “शहराला नव्हे तर विषाणूला टाळेबंदी लावायची आहे. मला काहीच होणार नाही, अशा अविर्भावात कुणी राहू नये. शहरात दोन हजारांच्या वर करोनाबाधित आहेत. गेल्या महिन्यात मृत्यूदर १ टक्केच्या खाली होता. आता तो १.५६ टक्के झाला आहे. नियम पाळले जात नाही. आपल्या समोरचा माणूस करोनाबाधित आहे असे समजून काळजी घेतली पाहिजे तर आपण करोनाची साखळी तोडू शकतो,” असं सांगितलं. ऑगस्ट महिन्यात ईद, रक्षाबंधन, गणेशोत्सव, दहीहंडी, महालक्ष्मीपूजन आदी उत्सव आहेत. परंतु सार्वजानिकरित्या हे उत्सव साजरे करू नका. नियमांचे पालन करून घरीच उत्सव साजरा करा, असं आवाहनही त्यांनी केले.