नवी दिल्ली, 21 मे : जगभरात कोव्हिड 19 मुळे कोट्यवधी लोकांच्या मृत्यूनंतरही कोरोना विषाणूचा नाश होण्याची चिन्ह नाहीत. भारतातही कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आता लॉकडाउनचे चार टप्पे लागू करण्यात आले आहेत, परंतु तरीदेखील रुग्णांची संख्या वाढतच आहे. देशातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली असून जगभरात ती 11 व्या स्थानावर आहे.
गुरुवारी ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणूची 112359 प्रकरणं नोंदवली गेली आहेत आणि 3435 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात विचार केला तर कोरोनाच्या प्रकरणांची संख्या 50 लाखांच्या पुढे गेली आहे.
गेल्या 24 तासात देशात कोरोनाची 5,609 नवीन प्रकरणं समोर आली असून 132 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोव्हिड 19 पासून देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 112359 पर्यंत वाढली आहे आणि 3435 लोकांचा बळी गेला आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासात कोरोना विषाणूमुळे 1561 लोकांचा मृत्यू झाला. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोना विषाणूची लागण 5,082,661 वर झाली आहे आणि या साथीमुळे 329,294 लोकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र आणि गुजरातनंतर तामिळनाडूमध्ये संसर्ग झपाट्याने पसरत आहे. या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 39 हजार 297 रुग्ण आढळले आहेत. 24 तासांत इथे 2250 नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली. गुजरातमध्ये एकूण 12 हजार 539 प्रकरणं आहेत, 24 तासांत 398 नोंद झाली आहे आणि तामिळनाडूमध्ये गुजरातपेक्षा जास्त 13 हजार 191 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. 24 तासांत 743 नवीन प्रकरणं नोंदली गेली आहेत.
जगभरात कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे आणि अमेरिकेमध्ये कोरोनामुळे सर्वात जास्त विनाश झाला. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवर कोरोना विषाणूवरून हल्ला केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर जगभरात कोरोना विषाणू पसरवण्याचा आणि सामूहिक हत्येचा आरोप केला आहे.