जबलपूर, 10 मे : देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. 46 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये हातात पैसा आणि काम दोन्ही नसल्यानं मजुरांनी आपल्या गावी परतण्याचा मार्ग निवडला आहे. मिळेल त्या साधनाचा वापर करून आपल्या घरी परतण्यासाठी मजुरांची धडपड सुरू आहे. अशाच परिस्थितीमध्ये मध्य प्रदेशात एक मोठा अपघात झाला. नरसिंहपूर इथे पाठा गावाजवळ आंब्याचा ट्रक उलटून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 5 लोकांचा मृत्यू झाला 11 जण जखमी आहेत. या ट्रकमध्ये आंब्यांसोबत ड्रायवरसह 18 लोक लपून आपल्या घरी जात असताना हा भीषण अपघात झाला.
आंब्याच्या ट्रकमध्ये बसून सर्व मजूर आग्राला जात होते. त्याचवेळी ट्रक उलटून भीषण अपघात झाला. यामध्ये 15 मजूर ट्रकखाली दबले गेले होतेय अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहाणी केली असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
सिव्हिल सर्जन अनिता अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर जखमी झालेल्या दोघांना जबलपूर इथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर दुसऱ्या मजुराला फ्रॅक्चर आहे. इतर जखमींची प्रकृती स्थिर आहे. जखमींपैकी एकाला तीन दिवस सर्दी, खोकला आणि ताप आहे. कोरोनाचा संशय असल्यानं सर्व मजुरांची कोविड-19 ची चाचणी केली जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.