नवी दिल्ली, 17 मे : देशभरात कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन 4.0 लागू करण्यात आला आहे. यामध्ये गृह मंत्रालयाने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोरोना विषाणूमुळे देशव्यापी लॉकडाउनचा चौथा टप्पा सोमवारपासून सुरू होईल आणि लोकांना अधिक सवलत आणि सूट मिळेल.
केंद्र सरकारने जारी केलेल्या तत्त्वांमध्ये मेट्रो, विमान सेवा बंद राहणार असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर शाळा, कॉलेज शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळं, धार्मिक कार्यक्रम, हॉटेल्स आणि सिनेमाहॉल त्याचबरोबर जीम बंददेखील बंदच राहणार आहे. तर रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. राज्य सरकार आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाईननुसार झोनचा निर्णय घेणार आहे.
दरम्यान, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथोरिटी (NDMA) याबाबत परिपत्रक जारी केलं होतं. त्यानुसार भारत सरकारअंतर्गत येणाऱ्या विविध विभाग आणि राज्य सरकारांना लॉकडाऊनची नियमावली 31 मेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले की, हा टप्पा आतापर्यंतच्या तीन लॉकडाऊनपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि अधिक सवलतींचा असेल.
त्याअंतर्गत, आज गृह मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आली. महाराष्ट्र (Maharashtra) सरकारनेही लॉकडाऊन कालावधी 31 मे पर्यंत वाढवला आहे. राज्य सरकारने 17 मे रोजी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. केंद्र शासनाने आपत्ती अधिनियम 2005 अंतर्गत लॉकडाऊन कालावधी 17 मेपर्यंत वाढवला होता. हा कालावधी आज संपला असून आता पुढे लॉकडाऊनचा चौथा टप्पा लागू करण्यात आला आहे.