नवी दिल्ली, 9 मे: देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, दुसरीकडे देशात कोरोना विषाणूचा रिकव्हरी दरात वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 30 टक्क्यांजवळ पोहोचले आहे. दिलासादायक बाब अशी की, 216 जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3320 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59,662 झाली असून लवकरच ती 60 हजारांचा टप्पा पार करणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 95 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांचा आकडा 1981 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 17,847 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की, देशातील प्रत्येक नागरिकाला लॉकडाऊनच्या नियमाचं काटेकोरपणे आणि प्रामाणिकपणे पालन करावे लागणार आहे. त्यानंतरच देशात घुसलेल्या कोरोनाला हद्दपार करता येईल.
देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ असली तरी प्रत्येक तीन रुग्णांमध्ये एक रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी जात आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर 29.91 टक्के आहे तर मृतांचा दर 3.2 टक्के आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात मृतांचा दर सुदैवाने खूप कमी आहे. मात्र, तरी देखील काळजी घेणे महत्त्वाचं असल्याचं लव अग्रवाल यांनी सांगितलं.
मागील सात दिवसांचा रिकव्हरी रेट...
9 मे : 29.91%
8 मे : 29.35%
7 मे : 28.83%
6 मे: 28.71%
5 मे: 28.17%
4 मे: 27.45%
3 मे: 26.59%
देशभरात तिसऱ्या लॉकडाऊनमध्येही कोरोना रुग्णसंख्या वाढीचा आलेख वाढतोच आहे. महाराष्ट्रातला आकडा सर्वात वेगाने वाढतो आहे. त्यातही सर्वाधिक कोरोनाग्रस्त महानगरी मुंबईत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचा दावा आहे की, राज्यात कोरोना चाचण्यांचं प्रमाण सर्वात जास्त असल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडादेखील वाढतो आहे. पण आता या दाव्याला छेद देत तामिळनाडूने चाचण्यांच्या संख्येत वाढ केली आहे.महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांपेक्षा तामिळनाडूत अधिक चाचण्या झाल्या आहेत. तरी या राज्यात कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रापेक्षा बरेच कमी आहेत.
आतापर्यंत देशभरात या विषाणूची लागण 59,662 लोकांना झाली आहे. देशभरात आतापर्यंत 1981 कोरोनाबळी गेले आहेत. त्यातही महाराष्ट्राचा आकडा सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वांत जास्त आहे. 18000 च्या वर हा आकडा गेलेला आहे. तामिळनाडूत मात्र गेल्या चार दिवसांपासून कोरोनारुग्णांचा आकडा वाढतो आहे. कारण या राज्याने चाचण्या करण्याचं प्रमाण वाढवलं आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार तामिळनाडूत 202436 नमुन्यांची COVID-19 चाचणी झाली. तर महाराष्ट्रात हाच आकडा 202105 आहे. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येचा विचार केला तर तामिळनाडूची लोकसंख्या फक्त 65 टक्के आहे. महाराष्ट्रात या दक्षिणी राज्याच्या तुलनेत तिप्पट रुग्ण आढळले आहेत. दहा दिवसांपूर्वी तामिळनाडूने कोरोना चाचण्यांचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे तिथे चाचण्या वाढल्या आहेत. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या मानाने इथे अजूनही अधिक प्रमाणात चाचण्यांची आवश्यकता आहे.