काँग्रेस ने शुक्रवारी आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली . मोदी सरकारचे 20 लाख कोटीरूपयांचे पॅकेज हा केवळ गरीबांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. या पॅकेजमध्ये त्यांच्यासाठी काहीही नसल्याने त्यांची फसवणूक झाली आहे, काँगेसच्या अस्थायी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. या बैठकीला 20 विरोधी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थिती राहिले.
कोरोना संकटाशी सामना प्रामुख्याने गरीबांना करावा लागत आहे. कोटय़वधी स्थलांतरीत कामगारांना सरकारने वाऱयावर सोडले असून त्यांच्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. सरकार लॉकडाऊनच्या परिणामांसंबंधी अज्ञानात होते असे दिसून येत आहे. तसेच लॉकडाऊन उठविताना कोणतेही योग्य दिशानिर्देश देण्यात आले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे असे अनेक आरोप सोनिया गांधी यांनी केले.
या बैठकीला द्रमुक, डावे पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रवादी काँगेस, नॅशनल कॉन्फरन्स, तृणमूल काँगेस आदी 20 पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ,मात्र समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे दोन महत्वाचे पक्ष अनुपस्थित होते. आम आदमी पक्षनेही दूर राहणे पसंत केले. मात्र आम आदमी पक्षाला निमंत्रणच दिले नव्हते, असे स्पष्टीकरण नंतर काँगेसने दिले. महत्वाचे पक्ष अनुपस्थित राहिल्याने विरोधी ऐक्य घडविण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे, असा आरोप नंतर काही राजकीय तज्ञांनी केला.