विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त झाल्या आहे. या रिक्त जागेवरून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडीत नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेस नेत्यांनी 12 जागा आणि महामंडळाच्या नेमणुकीसाठी नवी मागणी केली असून लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे.
दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, 11 जून रोजी गुरुवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबईचे पालक मंत्री असलम शेख, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि इतर नेते हजर होते.
या बैठकीमध्ये येणाऱ्या काळात विधान परिषदेच्या जागा आणि महामंडळावर नेमणुकीबद्दल समसमान वाटप व्हावे, अशी चर्चा झाली. याआधीही आमदारांच्या संख्येवरून मंत्रिपदाचे वाटप झाले होते. पण, इतर बाबीत सर्व वाटप हे समसमान होईल, असं महाविकास आघाडीत ठरलं होतं. एवढंच नाहीतर विधान परिषदेच्या जागा ही तिन्ही पक्षांनी समान वाटून घ्याव्यात, असा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता.
परंतु, विधान परिषदेत जागा वाटप करत असताना शिवसेनेला 5 जागा, राष्ट्रवादी 4 तर काँग्रेसला 3 जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रस्तावामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी विधान परिषदेच्या जागा वाटपात समसमान व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. याबद्दल लवकरच काँग्रेस नेते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.
दरम्यान, सत्तेत असतानाही आमचे काही प्रश्न आहेत आणि ते आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातले आहेत, अशी एक प्रकारची नाराजीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
सरकारमध्ये असुनही काँग्रेसला विचारात घेतलं जात नाही, काँग्रेस नाराज आहे का? असा थेट प्रश्न थोरातांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, 'साहजिकच आहे आमचेही काही प्रश्न आहेत. अपेक्षा आहेत. त्यावर काम व्हावं असं आम्हाला वाटतं. आमच्या जेव्हा एकत्र बैठका होतात. त्यात आम्ही आमच्या भावना व्यक्त करतो असं सांगत त्यांनी नाराजीचा सूर लावला.
सत्ता स्थापनेपासूनच काँग्रेसमध्ये अशा प्रकारची भावना होती असं बोललं जातं आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही काँग्रेसने एका जागेवरून ताणून धरलं होतं. नंतर तो प्रश्न सोडविण्यात आल होता.
त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनांही आम्ही सरकारमध्ये असलो तर निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला नाहीत असं म्हटलं होतं. तर त्याही आधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही नाराजी बोलून दाखवली होती. राज्यात आम्ही सत्तेत असलो तरी हे काँग्रेसचं नाही तर शिवसेनेचं सरकार आहे, असं चव्हाण एका कार्यकर्त्याशी बोलताना म्हणाले होते.