गणेशोत्सवासाठी कोकणात १२ तारखेपर्यंत दाखल होण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे गुरुवारपासून कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांना करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. ई- पास आणि करोना चाचणी अहवाल असल्याशिवाय गणेशभक्तांना कोकणात प्रवेश दिला जात नाही. मुंबई -गोवा महामार्गावर यासाठी तपासणी नाके सुरु करण्यात आले आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांना सुरूवातीला १४ दिवस आणि नंतर १० दिवस क्वोरंटाईनची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे सुरूवातीला ७ ऑगस्ट आणि नंतर १२ ऑगस्टपुर्वी गणेशभक्तांनी कोकणात दाखल होण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता मात्र ही मुदत संपली आहे. त्यामुळे कोकणात दाखल होणाऱ्या सर्व गणेश भक्तांना आजपासून ई पास आणि करोना चाचणी केल्याचा अहवाल सक्तीचा असणार आहे. अन्यथा त्यांना रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. यासाठी मुंबई -गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पोलिसांनी तपासणी नाके उभारले आहेत. रायगड जिल्ह्यात मुंबई -गोवा महामार्गावर खारपाडा आणि कशेडी येथे चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. तर खोपोली आणि ताम्हाणी घाटातही चेक पोस्ट पुन्हा कार्यान्वयित करण्यात आले आहेत.
या ठिकाणी दाखल होणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. तपासणी दरम्यान ई -पास आणि करोना चाचणी अहवाल असेल तरच त्यांना पुढे जाण्यास परवानगी दिली जाणार आहे. अन्यथा त्यांना परत मुंबईकडे पाठविले जाणार आहे.
‘महामार्गावर सहा अधिकारी आणि १४० कर्मचारी असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. हा बंदोबस्त वाहनांची संख्या लक्षात घेऊन वाढविण्यात येणार आहे.’