राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ७९ व्या वर्षी रायगड पायी सर केला. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी ही आपल्यासारख्या गडप्रेमी शिवभक्तांसाठी समाधान देणारी बाब असल्याचं म्हटलं. तसंच त्यांनी दरवर्षी मंत्रिमंडळाची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश द्यावे अशी विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली आहे. तसंच राज्यपालांनी प्रत्येक मंत्र्याला एकेक किल्ला दत्तक घेण्याचं आवाहन केलं त्याचंही आपण स्वागत करत असल्याचे ते म्हणाले.
“राज्यपालांना माझी एक विनंती असेल, जी मी अनेक वर्षांपासून मागणी करत आहे. दरवर्षी मंत्रिमंडळाची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश आपण द्यावेत. जेणेकरून महाराजांनी ज्या ध्येयवादाने रायगडावर राज्याभिषेक करवून घेतला, तो राजकारणी आणि अधिकाऱ्यांना लक्षात येईल. स्वराज्याला सुराज्यात रूपांतरित करून प्रशासनासाठी उत्तम राज्यकारभार नेमका कसा करावा याची प्रेरणा मिळेल,” असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धन मोहिमेत सरकारने शिवप्रेमींना सहकार्य करून पाठिंबा द्यावा ही अपेक्षा नेहमीच केली गेली. त्यामुळे राज्यपालांनी जो प्रत्येक मंत्र्यांना गड दत्तक घेण्याची सूचना केली ती रास्त असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
राज्यपालांनी पायी सर केला रायगड किल्ला
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी पायी चालत शिवनेरी किल्ली सर केला. पुणे दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल कोश्यारी यांनी पायी चालत किल्ला सर करण्याची मानस बोलून दाखवला. महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या ७९ व्या वर्षीही कोश्यारी यांनी शिवनेरी किल्ला पायी चालत सर केला. अशाप्रकारे पायी चालत शिवनेरी किल्ला सर करणारे कोश्यारी हे पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. राज्यपालांचा फिटनेस पाहून या भेटीदरम्यान उपस्थित असलेले इतर अधिकारीही अवाक झाले.