Coronavirus च्या महासाथीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा कशी घ्यायची, घ्यायची की नाही यासाठी महाराष्ट्रात अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून गोंधळ झाला. शेवटी राज्य सरकारने परीक्षा ऐच्छिक ठेवण्याची घोषणा केली. आता केंद्रीय पातळीवर विद्यापीठ अनुदान मंडळ (UGC) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. COVID चा उद्रेक अनेक राज्यांमध्ये नव्याने वाढतोय हे लक्षात घेत जुलैमध्ये होणाऱ्या विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द होण्याची शक्यता आहे. इंजिनिअरिंगसह सर्व वर्षांच्या कॉलेजच्या परीक्षा होणार नाहीत. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षही ऑक्टोबरशिवाय सुरू होणार नाही, असं PTI ने म्हटलं आहे.
मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनीदेखील विद्यापीठ अनुदान मंडळाला त्यांचे परीक्षेसंबंधी नियम विद्यार्थ्यांचं आरोग्य प्राधान्यक्रमांकावर ठेवून विचारात घ्यावेत अशी सूचना केली आहे. त्यामुळे देशभरातच विद्यापीठ स्तरावरच्या परीक्षा रद्द होण्याची चिन्हं आहेत.
महाराष्ट्रासारख्याच इतर काही राज्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा घ्यायची तयारी केली होती. तर काही विशेषतः Covid-19 चा प्रादुर्भाव मोठा असलेल्या भागातल्या विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांनी परीक्षा घेणं अवघड असल्याचं कळवलं होतं.
तंत्रशिक्षणासंदर्भातली शिखर संस्था AICTE चे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितलं की, COVID-19 च्या साथीत अनेक शिक्षण संस्थांनी परीक्षा घेण्याची परिस्थिती नसल्याचं कळवलं आहे. आता UGC सुद्धा नवे नियम करण्याच्या आधी परिस्थितीचा विचार करून परीक्षा नियमात बदल करण्याची शक्यता आहे
इंटरमीजिएट आणि टर्मिनल सेमिस्टर एक्झाम घेण्याच्या नियमांचा पुनर्विचार करण्याची सूचना मनुष्यबळ विकासमंत्री निशंक यांनी केल्यानंतर आता UGC अंतिम परीक्षांबाबतचे नियमसुद्धा बदलू शकते.
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, डेंटल कौन्सिल आणि आर्किटेक्चरसंदर्भातल्या संस्थांनी ऑनलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात सल्ला दिला आहे. तर काही व्यवसायाधीष्ठित संस्थांनी मात्र परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना पदवी देणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे.