राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उत्तरावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रातून मंदिर उघडण्याचा विषय मांडताना उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची करुन दिली. यावर उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही अशा शब्दांत उत्तर दिलं. यावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला असून आधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा अशी टीका केली आहे.
नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी स्क्रिनशॉट शेअर केला आहे. “धर्मनिरपेक्षता संपली आहे, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा” अशा मथळ्याखाली लिहिण्यात आलेल्या लेखात संजय राऊत यांचा उल्लेख आहे. नितेश राणे यांनी यावरुन उद्धव ठाकरेंना यावर तुम्ही प्रत्युत्तर देऊ इच्छित नाही का ? अशी विचारणा केली.
नितेश राणे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “यावरही उत्तर द्यावं असं वाटत नाही का…मिस्टर सीएम? की नेहमीप्रमाणे हे फक्त राजकारण होतं? इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा”.
काय आहे नेमकं प्रकरण :
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंदिर खुली करण्याच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. “एकीकडे सरकार बार, रेस्टॉरंट खुले करत आहेत. तर देवीदेवतांना मात्र अजूनही लॉकडाउनमध्येच ठेवलं आहे. मागील तीन महिन्याच्या काळात अनेक शिष्टमंडळांनी या संदर्भात माझी भेट घेतली आहे. तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात. तुम्ही हे सार्वजनिकरित्या मान्यही करता. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही आयोध्येलाही गेला होता. तुम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुख्मिणीचीही पूजा केली. अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आली असून, महाराष्ट्रातही करोना मार्गदर्शक सूचनाची अमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी,” असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे.
राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. “प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जिवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे, तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचं हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.