लोकसभेत शुक्रवारी काँग्रेस खासदार चांगलेच आक्रमक झालेत. केंद्रीय अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी अर्थ विधेयकावर बोलतांना गांधी आणि नेहरुंवर टीका केली. त्यामुळे विरोधीपक्ष नेते अधीर रंजन चौधरी चांगलेच भडकले त्यांनी अनुराग ठाकूर यांच्याबद्दल असंसदीय शब्दांचा वापर केल्याचा आरोप भाजपने केला.
पंतप्रधान केअर्स फंडाबाबत (PM Cares Fund) काँग्रेसच्या खासदारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या फंडातल्या पैशांबाबत माहिती दिली जात नाही. त्याचं ऑडिट होत नाही अशी टीका काँग्रेसने सातत्याने केली होती.
त्या टीकेला उत्तर देतांना अनुराग ठाकूर म्हणाले, पंडित नेहरूंनी जो फंड स्थापन केला होता त्याचं रजिस्ट्रेशन आत्तापर्यंत झालं नाही. काँग्रेस सरकारांनी फक्त गांधी कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापन केले अशी टीका केली होती.
त्यावर चौधरी यांनी जोरदार आक्षेप घेत असं बोलणारे ठाकूर हे कोण लागून गेले असं म्हणत त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला. त्यांनी असंसदीय शब्दांचा वापर केला असं म्हणत भाजपने आक्षेप नोंदवला. तर तृणमूलच्या खासदाराने थेट अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरच भाजप मंत्र्यांना वाचवत असल्याचा आरोप केला.
त्यावर अध्यक्षांनी तृणमूलच्या खासदारांना मास्क घालून बोला, सुरक्षा नियमांचं उल्लंघन करू नका अशी ताकीद दिली. या गोंधळात काही काळ लोकसभा तहकूबही करण्यात आली.