मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थगित केल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण विषयावर सलग 5 मिनिटं बोलून दाखवावं अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य सरकार चालवण्याबाबत गंभीर नाहीत असंही यावेळी पाटील म्हणाले. खरंतर मराठा आरक्षण (maratha reservation) प्रकरणात सुप्रीम कोर्टात (maratha quota in supreme court) सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय दिल्यानंतर एकच संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद आता राज्यभर उमटायला सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षणाचा वाद आता पुन्हा पेटला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपने ठाकरे सरकारवर जहरी टीका केली आहे. मराठा समजाला आरक्षण देण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरलं. मुख्यमंत्र्यांना विषय माहिती नसेल तर तो विषय समजून घेण्याची तयारी पाहिजे असा सल्लाही यावेळी बोलताना पाटलांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, 'कंगनाबद्दलही उद्धव ठाकरे गंभीर नाहीत. त्या विषयाची जबाबदारी संजय राऊतांवर दिली आहे. यश मिळालं तर आपलं आणि अपयश मिळालं तर ते संजय राऊतांचं अशी यांची भूमिका आहे' अशी गंभीर टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. मराठा संदर्भात संबंधित मंत्री अशोक चव्हाण किंवा वरिष्ठ अधिका-यांनी दिल्लीत ठाणं मांडून बसायला हवं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही काँग्रेस नेत्यांची अनेक वर्षांची मानसिकता आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत गांभीर्यपूर्वक प्रयत्न केले गेले नाहीत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.