अयोध्येतल्या राम मंदिर उभारणीला विलंब होण्याची शक्यता आहे. राम मंदिराचा पाया खोदताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी देशभरातील आयआयटी तज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यात येत आहे. या विलंबामुळे राम मंदिर उभारणीचं काम 2024 अखेरपर्यंत किंवा 2025 मध्ये पूर्ण होण्याची चिन्हं आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 5 ऑगस्टला राम मंदिराचं भूमिपूजन केलं. यानंतर कामाला सुरूवात झाली. 15 जानेवारीपासून पायाभरणीचं काम सुरु झालं. हे मंदिर पुढील 1 हजार वर्ष कसं सुरक्षित राहील यासाठी एलएनटी आणि टाटा कन्स्ट्रक्शनचे सर्व इंजिनिअर्स सध्या काम करत आहेत.
प्रस्तावित राम मंदिरामध्ये 1200 खांब उभारण्याची योजना आहे. काही दिवसांपूर्वी या खांबांवर वजन टाकण्यात आलं त्यावेळी त्याच्या पायाशी असलेली जमीन काही इंच दबली गेली. त्यावेळी ती माती वाळूममिश्रित असल्याचं निष्पन्न झाले. या अडचणींवर मात करण्यासाठी मंदिराचे निर्माण हार्ड स्टोननं केलं जाणार आहे. यासाठी पायाच्या आतमध्ये जुन्या पद्धतीनुसार जवळपास 50 फुट खोल खड्डे खोदले जातील. पाया भरणीसाठी मिर्झापूरचे (Mirzapur) खास दगड वापरण्यात येत आहेत. या दगडांवर मंदिराची निर्मिती केली जाणार आहे.
या मंदिराच्या बांधकामाचं काम देशातील नऊ इंजिनिअरिंग इंस्टीट्यूटचे टॉप इंजिनिअर्स करत आहेत, अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष चंपत राय यांनी दिली आहे.