अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याला राज्य सरकारचा विरोध आहे. कारण महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉटलँड यार्डच्या पोलिसांसोबत होते. कोणत्याही क्लिष्ट प्रकरणांचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहेत, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी गृहमंत्री गोंदिया येथे आले होते.
या प्रकरणात सर्वानी आपापले म्हणणे मांडले आहे. ही प्रतिज्ञापत्रे सर्वोच्च न्यायालयाकडे दिली आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पुढील आठवडय़ात येणार असून त्यांच्या आदेशानुसार याप्रकरणी निर्णय घेतला जाणार असून सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा काय निर्णय येतो, यावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. मुंबई पोलीस पूर्ण क्षमतेने या प्रकरणात तपास करीत आहे. छडा लावण्याच्या दिशेने त्यांचे काम सुरू आहे.
या प्रकरणातील संबंधितांचे मोबाईल कॉल डिटेलसह इतर कागदपत्रांची मागणी ईडीने केली असता मुंबई पोलिसांनी ते देण्यास नकार दिला. यावर बोलण्याचे गृहमंत्र्यांनी बोलणे टाळले. राज्यासह देशभरात सुशांत मृत्यूप्रकरण गाजत आहे. तो मूळ बिहारचा आहे आणि तेथील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यात हा मुख्य मुद्दा राहणार असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
त्यादृष्टीने काही राजकीय पक्षांनी निरीक्षकांसह, निवडणूक प्रभारी म्हणून महाराष्टातील नेत्यांच्या नियुक्त्यास सुरुवात केली आहे.