राज्यात शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा मर्यादित आहेत. त्यामुळे या सुविधांमध्ये झपाटय़ाने वाढ करतानाच कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठय़ा प्रमाणावर तपासण्या करून करोनाबाधितांचा मृत्यूदर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्टय़ आहे. यादृष्टीने विविध जिल्ह्यंमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांनी मुंबईच्या पथकातील ( टास्क फोर्स) डॉक्टरांच्या संपर्कात राहून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाशी संवाद साधला. करोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यंमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत, जेणे करून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच मृत्यूदर देखील झपाटय़ाने कमी होऊ शकेल, असे ते म्हणाले. मृत्यूदर कमी नाही, तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्टय़ असले पाहिजे. त्यादृष्टीने नेमकी उपचारपद्धती, उपचारांमध्ये सर्व जिल्ह्यंत एकसुत्रीपणा आणि समानता असणे आवश्यक आहे. म्हणूनच जिल्ह्यंतील तज्ज्ञ डॉक्टरांचा गट आणि मुंबईतील तज्ज्ञांची एकत्रित बैठक आयोजित केल्याचे मुख्यमंत्र्यानी प्रारंभीच स्पष्ट केले.
उपचारांच्या बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे दिली जातात, त्याकडे सर्वानी काळजीपूर्वक लक्ष द्यावे. नको तिथे अनावश्यक औषधे देऊ नयेत. अडचण येईल तेव्हा तत्काळ आमच्याशी संपर्क साधा, असे मुंबईतील टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले.
डॉ. तात्याराव लहाने यांनी या बैठकीचे सूत्रसंचालन केले.
‘औषधांबाबत मार्गदर्शक सूचना असाव्यात’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईत टास्क फोर्सने चांगले काम केले आहे. सुरुवातीला औषधे नव्हती, आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे सर्वत्र या औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत. धारावी आणि वरळीत औषधे नसतानाही तेथील प्रादुर्भाव रोखण्यात यश आले. आता काही विशेष औषधे असून त्याच्या उपचाराबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे लागू केली जावीत.