वि* दर्भातील शेतकऱ्यांना गेल्या 4 जानेवारीपासून आस्मानी संकटांचा सामना करावा लागतो आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि नागपूरसह इतरही जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेले सर्वच पिक जमिनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकसान झालेल्या भागांचा आढावा घेतला असता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार जवळपास ७ हजार ४३१ हेक्टर क्षेत्रांमध्ये कापूस, गहू, हरभरा, तूर, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे. ८ हजार ३३४ शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पावसाने सर्वाधिक फटका तुरीला बसला असून दीड हजार हेक्टरमधील तुरीचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी महसूल यंत्रणेला यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. रामटेक, सावनेर, नागपूर ग्रामीण, कामठी, पारशिवनी, या तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहेत. शिवाय जिल्ह्यात झालेला नुकसानीचे पंचनामे करण्याबाबतचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. काढणीला आलेले संत्र देखील जमीनधोस्त झाले आहेत. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी बांधांवर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आहे.