संभाजीनगर,
रस्ते अपघात कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवून जिल्ह्यामध्ये रस्ते अपघात कमी केलेले आहेत. ही उल्लेखनीय बाब आहे. यासाठी संभाजीनगर जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा सत्कार सह्याद्री राज्य अतिथी गृह, मलबार हिल, मुंबई येथे राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य रस्ता सुरक्षा समितीला रस्ते अपघात मूत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण 10 टक्याने कमी करण्याचे उद्दिष्ट दिलेले होते. त्या अनुषंगाने संभाजीनगर जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अधिनस्त समितीने सुनियोजन पद्धतीने कामकाज केले. शहरातील अपघात व मृत्यू प्रमाण कमी करणे करीता शहरातील अपघात प्रवणक्षेत्र असलेल्या ठिकाणी तत्कालिन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, तत्कालिन प्रादेशिक परिवहन अधिकारी सतिश सदामते तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी एकत्रित भेट देवून उपाय योजना सूचविल्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपघात विश्लेषन समिती गठित करण्यात आली. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन परिक्षेत्र निहाय प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा प्रत्येकी एक एक सदस्यांची नेमणूक करून प्राणांतिक व जबर जखमी असलेल्या अपघात ठिकाणास 48 तासांच्या आत भेट देवून उपाययोजना संबंधित विभाग, प्राधिकरणाव्दारे अंमलबजावणी करण्यात आल्याने अपघात व मृत्यू प्रमाण कमी होण्यास मदत झाली.