स्वदेशीच्या आधारावर तंत्रज्ञानाचा विकास करून स्वावलंबी होणे शक्य : नितीन गडकरी स्वदेशी जागरण मंचातर्फे उद्योजकांचा सत्कार
स्वदेशी जागरण मंचातर्फे उद्योजकांचा सत्कार
स्वदेशीचा आधार घेऊन तंत्रज्ञानाचा विकास करीत आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या भागाचा विकास करून देश स्वावलंबी होऊ शकतो. तसेच विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करून ते गावांमध्ये पोहोचावे आणि गावांचा विकास व्हावा. यातूनच आयातीला पर्याय निर्माण होईल व देश स्वावलंबी होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
स्वदेशी जागरण मंचातर्फे काही उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. रा. स्व. संघाचे प्रचारक डॉ. मनमोहन वैद्य हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आपला उद्योग-व्यवसाय हा एक परिवार आहे, अशी संकल्पना स्व. दत्तोपंत ठेंगडी यांनी रुजवली होती, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- व्यवसायातून पैसा कमावला पाहिजे पण आपल्या सोबत काम करणारे हा एक परिवार आहे, ही सामाजिक जबाबदारीची जाणीव असली पाहिजे. आमच्यावर जे संस्कार झाले ते दत्तोपंतांमुळे झाले. सामाजिक समानता, सामाजिक समरसता, स्वदेशी, कामगार संघटन, अर्थव्यवस्था या क्षेत्रात खूप मोठे कार्य त्यांनी केले आहे. आर्थिक, सामाजिक मागासलेपणा दूर करण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले. समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी दिलेले सामाजिक चिंतन, समन्वयाचा विचार आणि देशाची आर्थिक व्यवस्था कशी मजबूत होईल, अशी त्यांची भावना होती, असेही ते म्हणाले.
आयातीला पर्याय निर्माण होऊन निर्यातीला प्रोत्साहन मिळाले पाहिजे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- 7 लाख कोटींच्या इंधनाची आयात कमी कशी करता येईल, यासाठी पर्याय समोर येणे आवश्यक आहे. जैविक इंधनाची निर्मिती आणि त्याचा वापर हाच त्यावर स्वदेशी आणि स्वावलंबनाकडे नेणारा पर्याय आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धेत आपण टिकावे, आपले उत्पादन वाढावे, उत्पादन खर्च कमी व्हावा, उत्पादनाचा दर्जा उत्तम असावा, किंमत कमी असावी, वाहतूक खर्चात बचत व्हावी, नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जावा, यामुळे आपण निर्यात वाढवू शकू व आर्थिक युध्दात टिकून राहू शकू असे सांगून ना. गडकरी म्हणाले- कोरोनाच्या काळात अनेक उद्योजकांनी आपला परिवार समजून उद्योग टिकवून ठेवले. उद्योगात काम करणार्याची काळजी घेतली. या काळात सकारात्मकता आणि आत्मविश्वास टिकवून ठेवणे आपली जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.
डॉ. मनमोहन वैद्य
कोरोना संक्रमणाच्या काळात साडे चार लाख स्वयंसेवक सेवा कार्यात सहभागी झाले होते, असे सांगताना रा. स्व. संघाचे प्रचारक डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले- या काळात अर्थव्यवस्था थांबली होती. सर्वच क्षेत्रात नैराश्य होते. पण आपला परिवार या भावनेने सेवा कार्य सुरु होते. केवळ स्वदेशी वस्तू वापरणे म्हणजेच स्वदेशीचा स्वीकार असे नसून स्वदेशी दृष्टी असणे आवश्यक आहे, असे सांगताना डॉ. वैद्य म्हणाले- कृषी हे एक मोठे क्षेत्र आहे. पण अनेक वर्षापासून हे क्षेत्र उपेक्षित राहिले आहे. पुन्हा या क्षेत्राकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. सेंद्रीय शेती वाढली पाहिजे. कमी पाण्यात अधिक उत्पादनचे तंत्र अवगत करता आले पाहिजे. त्यासाठी प्रशिक्षणाची गरज असेल, तर प्रशिक्षण दिले जावे. पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवता आले पाहिजे, असेही ते म्हणाले.
गावातून लोक शहरांकडे जात आहेत. कारण रोजगार शहरात उपलब्ध होत आहे. गावातच रोजगार उपलब्ध झाले, तर लोक शहराकडे धाव घेणार नाही. यासाठी गावांमध्ये उद्योग आणणे आवश्यक आहे. यामुळे गावांचाही विकास होईल. स्वदेशीच्या दृष्टीतून गावांच्या विकासाची योजना, उत्पादनात वाढ, कृषीचा विकास, सामाजिक वातावरण निर्मिती या मुद्यांवरही डॉ. वैद्य यांनी आपल्या मार्गदर्शनातून भर दिला.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प