पालघर - मोखाडा तालुक्यात उच्च शिक्षणाची आधिच वाणवा आहे. त्यातच भौगोलिक परिस्थिती आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा यामूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तब्बल ३० वर्षापासून आडोशी नजीक पुलच नसल्याने परिसरातील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात हमखास दांडी मारावी लागत आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनमानावर होत असलेला दुरगामी परिणाम लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
सन १९९० साली याठिकाणी स्थानिक ठेकेदारांनी पुल बांधला होता. त्यानंतर काही काळ याठिकाणावरुन परिसरातील रहिवाशांना सुलभपणे रहदारी करने सोयीचे झाले होते. परंतु बांधकामाच्या सुमार दर्जामुळे सदरच्या पुलाला अल्पावधीतच जलसमाधी मिळाली असल्याने पावसाळ्यात लगतच्या परिसरातील रहिवाशांना आणि विशेष करुन विद्यार्थ्यांना तर अक्षरशः जीव मुठीत घेवूनच या ठिकाणाहून मार्गक्रमण करावे लागत आहे.
आडोशी येथे राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहे. येथे असंख्य डे स्कॉलर विद्यार्थी बाहेरुन येवून शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. या ठिकाणी देखील जुजबी उपचारासाठी तसेच सर्पदंश, साथीचे आजार, प्रसूती पूर्व उपचार आदि साठी रुग्णांचा ओघ सुरू असतो. मात्र ८ महिने सोडले तर पावसाळ्याचे ४ महिने भुरीटेक आदि परिसरातील जनतेला या मुलभुत सेवांना पारखे रहावे लागत आहे. मात्र स्थानिक बांधकाम प्रशासन तब्बल ३० वर्षांपासून डोळ्याला झापडे लावून बसले असल्याने स्थानिकांना अनंत अडचणींशी सामना करावा लागत आहे.
दरम्यान याबाबत बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता देवबांध नदीवर ३ पुल बांधण्याची अर्थसंकल्पात मंजूरी दिली आहे असल्याची माहिती मिळाली आहे. परंतू त्यात कोणत्या ठिकाणी आणि केंव्हा पुल बांधणार आहेत याबाबत संदिग्धता असल्याने परिसरातील नागरिकांना यंदाचा पावसाळाही हवाल्यावरच काढावा लागणार असल्याचे चित्र आहे.
केवळ पुला अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे तर नागरिकांच्या आरोग्याशीही खेळ होत आहे. शासनाने त्याची दखल घेवून उपाययोजना करावी.