जेजुरी :
अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा कोरोनामुळे रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आहे. सोमवती यात्रेच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत मोठ्या प्रमाणावर भाविक खंडेरायाच्या दर्शनासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार, जेजुरीत कलम 144 नुसार, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी 12 ते 14 डिसेंबर दरम्यान, जेजुरीत येऊ नये, सोमवती यात्रेचा सोहळा रद्द करण्यात आला आहे, असं आवाहन मार्तंड देवस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे यांनीही केलं आहे.
13 ते 14 तारखेदरम्यान जेजुरीत येऊ नका, असं आवाहनही जिल्हा प्रशासनाने केलं आहे. 12 ते 14 डिसेंबरपर्यंत, म्हणजेच, शनिवार ते सोमवार तीन दिवसांसाठी भाविकांना जेजुरीत प्रवेश दिला जाणार नाहीय. त्याचप्रमाणे या तीन दिवसात खंडोबा गडाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात येणार असून मंगळवार नंतर पुन्हा खंडोबा गडावर भाविक जाऊ शकतील, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली आहे.