संत जनाबाई निधन (१५ मे ,१३५०)
संदर्भ : डॉ.सुहासिनी यशवंत इर्लेकर यांनी लिहिलेले संत जनाबाई हे पुस्तक
संत जनाबाई
संत जनाबाई निधन (१५ मे ,१३५०)
बॉक्स...
संदर्भ : डॉ.सुहासिनी यशवंत इर्लेकर यांनी लिहिलेले संत जनाबाई हे पुस्तक
गंगाखेड नावाच्या गावात राहणाऱ्या, ‘दमा’ नावाच्या एका शूद्र जातीच्या भक्ताची, जनाबाई ही मुलगी. या तिच्या जातीबद्दलचा उल्लेख तिच्या अनेक अभंगांतून तिने स्वत: केलेला आहे. दमाला स्वप्नात दृष्टान्त झाला आणि त्या दृष्टान्तानुसार, विठ्ठलभक्त असणार्या, पंढरपुरात वास्तव्य करणार्या, शिंपी जातीच्या दामाशेट्टींकडे आपल्या चिमुरड्या जनीला सोडून दमा निघून गेला. दामाशेट्टींचं सगळंच कुटुंब भगवद्भक्त होतं. पंढरपूरच्या केशिराजाची पूजा त्यांच्याकडे चालत असे. त्यांचा मुलगा नामदेव हा तर इतका विठ्ठलवेडा होता की तो विठ्ठलाला आपला मित्रसखाच मानत असे.
अशा नामदेवाच्या कुटुंबात जनाबाई आश्रित म्हणून राहिली. आश्रित म्हणून असली तरी, जनाबाई दामाशेट्टीच्या कुटुंबापैकीच एक झाली होती.
नामदेवाच्या घरात वावरताना त्या दासीचे जग ते केव्हढे असणार? अंगण, परसू, माजघर, कोठार एव्हढ्याच सीमेत ती वावरत असणार. पण शरीराने इतक्या सीमित जागेत वावरणारी जनी मनानं मात्र असीम अशा परमात्म्याला पहात होती. त्याचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होती. तुळशीवृंदावन, अंगण, रांजण, जातं, शेणी वेचायला जाण्याचं रान अशा स्थळांचे तिच्या अभंगांत उल्लेख आहेत आणि त्या सर्व जागांवर देव तिचा सांगाती आहे. तो कोठीखोलीत तिला दळू लागतो, रानात शेण्या वेचू लागतो, अंगणात सडा घालू लागतो. तेंव्हा जनाबाई म्हणतात
झाडलोट करी जनी। केर भरी चक्रपाणी।।
पाटी घेऊनियां शिरी। नेऊनियां टाकी दुरी।।
ऐसा भक्तिसी भुलला। नीच कामें करूं लागला।।
जनी म्हणे विठोबाला। काय उतराई होंऊ तुला।।
वारकरी सांप्रदायामध्ये संत नामदेवाची दासी म्हणून आयुष्यभर संत जनाबाई राहिल्या .त्यांनी जवळपास ३५० रचना केल्या त्या पैकी काही नामदेवांच्या समजल्या जातात.त्यांचे म्हणणे होते की पुनर्जन्म कुठलाही असुदे तो पंढरपुरात असला पाहिजे व त्या जन्माला आलेल्या जीवाला पांडुरंगाची व संत नामदेवांची सेवा करता आली पाहिजे असे त्यांना वाटत असे म्हणून त्या म्हणतात
देवा देई गर्भवास। तरीच पुरेच माझी आस।।
परी हे देखा रे पंढरी। सेवा नाम्याचे द्वारी।।
करी पक्षी का सुकर। श्वान,श्वापद मार्जार।।
ऐसा होत माझे मनी। म्हणे नामयाची जनी।।
जनाबाईं बद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. तिचा जिवलग विठ्ठल दिवसभर काम करून दमलेल्या जनाबाईशी गुजगोष्टी करायला येत असे.एके दिवशी परत जाताना विठ्ठल तिच्या घरी त्याचे पदक विसरला आणि ते पदक जनाबाईने चोरले असा आळ तिच्यावर घेऊन तिला सुळावर चढवायची शिक्षा फर्मावली जाते, चंद्रभागेच्या वाळवंटात सूळ उभा केला जातो.जनाबाई विठ्ठलाचा धावा करते आणि त्या सुळाचे पाणी होते. या कथेवर प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांनी माळ पदक विठ्ठल विसरला भक्ताघरी हे सुंदर गाणे लिहिले आणि माणिक वर्मानी ते गायले आहे.
जनाबाईने लिहिलेल्या अभंगांपैकी काही अभंग सोबत दिले आहेत. जनाबाई थोरच आणि ते अभंग सुंदर संगीतामध्ये सजवणारे संगीतकार आणि गाऊन त्यांना चिरंतन करणारे गायक / गायिका देखील तेव्हडेच तोलामोलाचे .
भारतरत्न पं.भीमसेन जोशी, पं.जितेंद्र अभिषेकी,किशोरी आमोणकर,आशा भोसले,अनुराधा पौडवाल यांनी संत जनाबाईंचे गायलेल्या अभंगांपैकी थोडे सोबत देतो आहे.
१) संत भार पंढरीत
२) दळीता कांडिता
३) येग येग विठाबाई
४) जनी म्हणे पांडुरंगा
५) धरिला पंढरीचा चोर
६) नाम विठोबाचे घ्यावे
७.विठू माझा लेकुरवाळा
वारकरी सांप्रदायाची पताका खांद्यावर घातलेल्या संत परंपरेतील थोर जनाबाईंना विनम्र अभिवादन.
प्रसाद जोग.सांगली.
९४२२०४११५०
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प