आळंदी: महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या देवाच्या आळंदीतील आणि देहूतील इंद्रायणी नदी वारकरी संप्रदायासाठी पवित्र मानली जाते. त्यामुळं लाखो भाविक आळंदी आणि देहूला दर्शनासाठी येत असतात. संजीवन समाधी सोहळा, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला या इंद्रायणीच्या घाटावर लाखो वारकरी येतात. या वारकऱ्यांसाठी या नदीचं पाणी तीर्थप्रमाने असते. वारकरी या नदीत स्नान करतात तसेच तीर्थ म्हणून नदीचं पाणी देखील पितात. मात्र, इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळं पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फेसाळलेली दिसून आली.
इंद्रायणी नदीमध्ये केमिकल कंपन्यांकडून राजरोसपणे सोडलं जात असलेलं मैला मिश्रित पाणी व केमिकल युक्त रसायनांबाबत अनेक वेळा स्थानिक नागरिक व इंद्रायणी सेवा फाउंडेशनकडून अनेक वेळा निवेदन देण्यात आले आहे. त्याचबरोबर खेड - आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधीद्वारा राज्य सरकारचे लक्ष्य वेधले होते. परंतु प्रदूषण नियंत्रण बोर्डकडून कठोर कार्यवाही होत नसून, अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा कारवाईला टाळाटाळ केली जात आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आळंदी येथे आले होते, तेव्हा त्यात वारकऱ्यांनी प्रदूषण मुक्त इंद्रायणी करण्याचं साकडं घातलं होतं, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन ही दिले होते. परंतु अद्यापही इंद्रायणी नदीकडे कोणी ढुंकूनही बघितलेले नाही आहे.
ही इंद्रायणी गंगा इतकी पवित्र आहे, की संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधीसाठीही याच इंद्रायणीची निवड केली. आज याच इंद्रायणीची स्थिती इतकी वाईट झाली आहे, की आळंदीत राहणाऱ्या आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाला तिला प्रदूषण मुक्त करण्यासाठी समाधी घेण्याची वेळ आली असून राज्यातील संवेदनशील सरकार ह्या पवित्र इंद्रायणी नदीला या प्रदूषणाच्या विखाळ्यातु बाहेर काढेल का? ही चिंता लागून आहे.