केतन रघुवंशी :- 8421732333
नंदुरबार - नवापूर येथे बर्ड फ्लू मुळे हाहाकार उडालेला असतांनाही ईकडे नंदुरबार शहरात उघड्यावर मांस विकणाऱ्या बेकायदेशीर गाड्या आणि स्टाँल मात्र बिनधास्तपणे चालू आहेत. जिल्हा प्रशासन याची दखल घेऊन आता तरी कडक कारवाई करणार काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
नंदुरबार शहरातील उघड्यावरील मांस विक्री आणि त्यातून उद्भवलेले गैरप्रकार हा विषय वारंवार उपस्थित होत आहे. परंतु निद्रिस्त नगरपालिका प्रशासन जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन त्याची दखल घेताना दिसलेले नाही. अन्य छोट्या छोट्या विक्रेत्यांना हातलाँरीवाल्यांना शंभर प्रकारचे कायदे नियम दाखवून कारवाई करणाऱ्या पोलिसांना आणि प्रशासनाला अद्याप उघड्यावरील मास विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात कोणामुळे आडकाठी येते? याची सदोदित चर्चा होत असते. नवापूर येथील बर्ड फ्लू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
नवापूर येथील चिंता करायला लावणारी पार्श्वभूमी अशी की तेथील बाधित क्षेत्रात 16 पोल्ट्रीमधील 4 लाख 90 हजार 485 कुक्कुट पक्षी आहेत. पहिल्या टप्प्यात नमुने पॉझिटीव्ह आलेल्या 4 पोल्ट्री फार्ममधील साधारण 1 लाख 26 हजार पक्ष्यांच्या कत्तलीचे काम पशुसंवर्धन विभागामार्फत सकाळी सुरू करण्यात आले. सायंकाळपर्यंत 30 हजार पक्ष्यांची शास्त्राक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान नवापूरमध्ये दुसऱ्यांदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला असल्याने यापुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी जैव सुरक्षा उपाययोजनांबाबत पोल्ट्री व्यावसायिकांना सविस्तर माहिती द्यावी आणि पोल्ट्री फार्ममध्ये मार्गदर्शक सुचनेननुसार उपाययोजना होत असल्याची खात्री करावी, असे निर्देश पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. सिंह यांनी पोल्ट्रीमधील कुक्कुट पक्ष्यांची विल्हेवाट लावण्याच्या कामाची पाहणी केली. विल्हेवाट लावताना सर्व मार्गदर्शक सुचनांचे कटाक्षाने पालन करावे आणि अधिकाऱ्यांनी सदर प्रक्रीयेकडे बारकाईने लक्ष द्यावे; असेही निर्देश त्यांनी दिले.
बर्ड फ्लूबाबत परिसरात गैरसमज पसरू नये याबाबत दक्षता घ्यावी. रोगाचा संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक सतर्कता बाळगावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी देखील केले आहेत. नगरपालिका हद्दीत दवंडी देण्यासही त्यांनी सांगितले.
हे सर्व लक्षात घेता नंदुरबार नगरपरिषदेने सुद्धा पूर्व सिद्धता ठेवणे अपेक्षित आहे त्याचा भाग म्हणून नवापूर येथून चोरट्या मार्गाने कोंबड्या आणल्या जात आहेत का यावर नजर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने मिळून उपाययोजना करायला हव्यात. अन्यथा नवापूर भागातील कोंबड्या नंदुरबार मध्ये पडेल दराने खपवून खिसे भरणाऱ्या लालची लोकांमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नंदुरबार शहरातील शाळा क्रमांक एक परिसर, शास्त्री मार्केट परिसर, मलकवाडा परिसर अशा अनेक ठिकाणी अजूनही उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या गाड्या उभ्या दिसतात. चिकन मटन चे अनेक प्रकार पदार्थ विक्री करणारे स्टॉल्स आणि गाड्या अधिकृत नसून बेकायदेशीर आहेत. रोग प्रसाराला हातभार लावायला ते कारणीभूत ठरू शकतात असे लक्षात घेऊन प्रशासनाने ताबडतोब नगरपरिषद हद्दीत सुरक्षिततेचे उपाय योजना अमलात आणाव्या हे जनतेला अपेक्षित आहे.