सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी) नंदुरबार
नंदुरबार- जिल्ह्यातील कोविड रुग्णांकडे जिल्हा प्रशासनाकडून दूर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांनी आमदार राजेश पाडवी यांच्या समवेत तातडीने जाऊन पॉझिटिव्ह रुग्णांची भेट घेत आस्थेने चौकशी केली व कोविड रुग्णांची चांगली सेवा करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक देखील केले. दरम्यान या भेटीत जिल्हाधिकारी यांच्यासमोर त्यांनी समस्या मांडल्यावर येत्या पाच दिवसात 50 लाख रुपयांचे रेमडीसीवर इंजेक्शन प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाअध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांच्या समवेत आमदार राजेश पाडवी यांनी काल दि 8 रोजी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची ही प्रत्यक्ष भेट घेतली. भेटीत पॉझिटिव्ह रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारणा केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, भाजपचे कैलास चौधरी, ऋषिकेश चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी कोविड सेंटरला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांबद्दल रुग्णांकडे त्यांनी विचारपूस केली. कोविड सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना अहोरात्र उत्तमपणे सेवा सुविधा देणाऱ्या डॉक्टर नर्स परिचारिका आदींच्या चांगल्या सेवेचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच नव्याने उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन प्लान्टची पाहणी केली. रुगणांना आवश्यक असलेल्या रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे निर्दशनास आल्यावर तात्काळ त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा केली व तातडीने जिल्हाधिकारी यांच्याकडे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी संपर्क करीत लेखी पत्रही दिले. त्यावर जिल्हा अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी 50 लक्ष रुपयांचा इंजेक्शन पुरवठा तात्काळ येत्या 4 ते 5 दिवसात होणार असल्याची माहिती दिली. नंदुरबार जिल्हयात प्रथमच अशापद्धतीने थेट कोरोना रुग्णांशी संपर्क साधून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली तसेच नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण राज्यात कोरोनाच्या भीतीने सर्वच राजकीय नेते घरात बसून असताना मात्र आज नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी व आमदार राजेश पाडवी यांनी थेट कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची विचारपूस केल्याने त्यांचे कोरोना रुग्णाबदद्ल असलेल्या आस्थेविषयी जनतेतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.