नंदुरबार : जुलै ते ऑक्टोबर 2019 मधील अतिवृष्टी व पूरामुळे शेतपिकांचे 33 टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या
आणि पिकासाठी कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना 1 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यासाठी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात 16 कोटी 56 लाख 61 हजार 500 रुपये प्राप्त झाले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील तहसीलदारांनी केलेल्या मागणीप्रमाणे प्रथम टप्प्यात ही रक्कम बीडीएस प्रणालीवर वितरीत करण्यात आली आहे.
दुसऱ्या टप्प्यात एवढीच रक्कम प्राप्त होणार आहे. नंदुरबार तालुक्यासाठी 4 कोटी 69 लाख 33 हजार 500,
नवापूर 53 लाख 71 हजार 500, शहादा 6 कोटी 99 लाख 52 हजार 500, तळोदा 2 कोटी 76 लाख 12 हजार,
अक्कलकुवा 1 कोटी 36 लाख 4 हजार आणि अक्राणी तालुक्यासाठी 54 लाख 28 हजार निधी प्राप्त झाला आहे.
ही मदत शेती किंवा बहुवार्षिक फळपिकाच्या नुकसानीकरीता 33 टक्के अथवा त्याहून अधिक झालेल्या नुकसान झालेल्यांना अनुज्ञेय राहील.
नुकसानीच्या पंचनाम्यानुसार आणि तहसिलदार यांनी दिलेल्या अहवालानुसार मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.
संबंधित बाधिताच्या बँक खात्यावर मदत जमा करण्यात येईल. कोणत्याही बाधितांना रोखीने मदतीचे वाटप करण्यात येणार नाही,
अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.