नंदुरबार - महाराष्ट्रात सर्वत्र दिसते तशी स्थिती नंदुरबार मध्ये देखील आहे येथील युवक निराश हताश आहेत. दुबार पेरणी च्या संकटामुळे शेतकरी त्रस्त आहे पाऊस नसल्याने दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. परंतु पालक मंत्री कमालीचे निष्क्रिय तर प्रशासन एकदम सुस्त आहे. या कार्यपद्धतीमुळे हे सरकार सर्व आघाड्यांवर फेल गेले. जनमनात आक्रोश आणि सरकार विषयी मोठी एन्टी इन्कम्बन्सी आहे; असा घणाघाती आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी नंदुरबार येथे पत्रकारांशी बोलताना केला.
युवा वॉरियर्स आणि हेल्थ वॉरियर्स अभियान संदर्भात महाराष्ट्राचे माजी ऊर्जामंत्री तथा भाजपाचे नेते चंद्रकांत बावनकुळे व भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे आज नंदुरबार दौऱ्यावर आले होते त्यादरम्यान अभियानाची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी , राजेंद्र गावित याप्रसंगी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत ओबीसी आरक्षणावरून विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना तत्कालीन सरकारने ओबीसी डेटा गोळा केला होता. तत्कालीन केंद्र सरकारकडून त्यात असंख्य चुका आणि त्रुटी असल्याबद्दलचे आलेले पत्र अजूनही आहे. परंतु हे सरकार जाणीवपूर्वक जनगणना आणि ओबीसी डेटा यात गल्लत करत आहे. ओबीसींची एकूण घरे किती याची माहिती काढून डेटा गोळा करणे कठीण नाही. पण या सरकारला तसे करायचे नाही. येत्या तीन महिन्यात यावर निर्णय झाला नाही तर आम्ही गाव बंद आंदोलन छेडणार असून आघाडी सरकारच्या कोणत्याही नेत्याला फिरू देणार नाही, असे माजी मंत्री बावनकुळे म्हणाले.
आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर त्यांनी सडकून टीका केली ते म्हणाले, राज्यातील महाआघाडीचे सरकार हे मुंबईपुरते मर्यादित आहे. उर्वरित महाराष्ट्राचे त्यांना काही पडलेले नाही. रोज उठून टिवटिव करणारे संजय राऊत नाना पटोले ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण, शेतकरी,युवक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करणार यावर बोलत नाहीत. वेगवेगळी स्टेटमेंट करुन प्रसिध्दीत रहाण्याचा प्रयत्न करणारे हे सरकार शेतकरी व शेतमजुरांच्या समस्या दुर करु शकत नाही. राज्यात अराजकतेचे वातावरण आहे. शेतक-यांच्या विजेच्या जोडण्या तोडण्याचे पाप हे सरकार करीत आहे. हे सरकार फक्त भ्रष्टाचार करणे शक्य असलेल्या बाबींवरच खर्च करीत आहेत.भाजपा सरकारच्या काळातील योजनांना निधी दिला जात नाही.
यावेळी माजी मंत्री बावनकुळे यांनी व भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी युवा वॉरीयर्स अभियानाची माहिती दिली. त्यात त्यांनी सांगितले की, राज्यातील तरुणांमधे नकारात्मक उर्जा तयार झाली असुन त्यांना योग्य व्यासपिठ उपलब्ध करुन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यात 97 हजार 643 मतदार केंद्र असुन त्यावर 25 लाख युवा वॉरीयर तयार करण्यात येणार आहे. ही नेमणुक शहरात वॉर्ड निहाय तर ग्रामीण भागात बुथ व ग्रामपंचायत निहाय केली जाणार आहे. या बरोबरच एका हेल्थ वर्करची नेमणुक केली जाणार असुन त्यांच्या माध्यमातुन कोरोनाच्या तिस-या लाटेत जनतेला आरोग्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333