सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
नंदुरबार गोरबोली भाषेला आठव्या राज्यभाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की, देशातील १२ ते १५ कोटी बंजारा बांधवांची मातृभाषा असलेल्या गोरबोली भाषेचा केंद्र सरकारच्या आठव्या सुचित समावेश करुन गोरबोली भाषेला राज्यभाषेचा दर्जा देण्यात यावा. गोरबोली भाषा ही पुर्वापारपासून प्रचलित व बंजारा समाजात बोलली जाते. समस्त बंजारा समाज पुर्वीपासून व्यवहार, परंपरा, उत्सव व दैनंदिन व्यवहार हे गोरबोली भाषेद्वारेच करतात. म्हणून बंजारा समाजाची लोकभावना लक्षात घेवून शासनाने गोरबोली भाषेला आठव्या राज्यभाषेचा दर्जा देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येत आहे. तरी आमच्या भावना आपल्या माध्यमातून शासनापर्यंत पोहचवावेत, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष मिलीन हेमंत जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे. उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर यांना निवेदन देतेप्रसंगी जिल्हाध्यक्ष मिलीन जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष गुड्डू राठोड, तालुकाध्यक्ष आकाश चव्हाण, शहर प्रमुख विजय राठोड, भारतीय किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव, प्रदीप राठोड, आशिष रामराजे आदी उपस्थित होते.