मोदी नावाच्या गावगुंडाला भंडारा पोलिसांनी अटक केल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकताच केला होता. पण आता त्यांच्यावर तोंडावर पडण्याची वेळ आली आहे. कारण त्यांचा हा दावा भंडारा पोलिसांनी (Bhandara Police) खोडून काढला आहे. आम्ही मोदी नावाच्या कोणालाही अटक केलेली नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
पोलीस अधिकारी अरुण वाईकर म्हणाले, "सोळा तारखेच्या घटनेबाबत सोशल मीडियावर ज्या अनेक प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. त्या संदर्भात पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या घटनेबाबत आम्ही चौकशी करत आहोत. चौकशीला आत्ता सुरुवात झालेली आहे. या चौकशीत जे काही निष्पण्ण होईल त्यावर पुढील कायदेशीर कारवाई होईल. याबाबत चौकशीचे निष्कर्ष नंतर कळवले जातील. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही, केवळ चौकशीला सुरुवात केली आहे"