(योगेश शर्मा)
बुलढाणा : भाजपाची सत्ता असलेल्या चिखली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस सह इतर अधिकारी, ठेकेदार व संबधीत लोकांनी कामे न करता व काही ठिकाणी एकाच कामाचे दोनदा बिले काढून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केले असल्याची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे, लोकायुक्त, संचालक सक्त वसुली संचालनालय मुंबई, प्रधान सचिव नगरविकास २, संचालक नगर रचना, महालेखापाल, आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी बुलढाणा यांना नुकतीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मा. विधानसभा संपर्क प्रमुख मयूर बोर्डे यांनी दिनांक ३० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे दाखल केली असून यामूळे आता राजकीय क्षेत्रासहित संपूर्ण जिल्हयात खळबळ माजली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मा. विधानसभा संपर्क प्रमुख मयूर बोर्डे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, भाजपाची सत्ता असलेल्या चिखली नगर परिषद येथे वैशिष्ट्यपूर्ण निधी योजने अंतर्गत सन २०१६ ते २०२१ मध्ये संबंधित ठेकेदार, इंजिनीयर, मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी संगनमत करून काम न करता कोट्यवधी रुपयांची बिले काढून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी संबंधितांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करणे तसेच विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत अर्धवट कामे करून कोट्यावधीचे बिले काढण्यात आलीत तसेच नगर परिषद निधी योजने अंतर्गत व विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत एकाच कामाचे दोन वेळेस बिले काढून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार, जेई, मुख्याधिकारी यांचेवर फौजदारी कारवाई करण्याबाबत मागणी केली आहे.
सदर तक्रार ही मयूर बोर्डे यांनी माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीच्या आधारे व प्रत्यक्ष स्थळपाहणीच्या आधारे तसेच नागरिकांच्या प्राप्त तक्रारीच्या आधारे केली असल्याचे नमूद केले आहे.
जवळपास सहा पानांची तक्रार अर्जात शहरातील अनेक कामांच्या बाबतीत उल्लेख करण्यात आल्याचे दिसून आले आहे. या तक्रार अर्जात मयूर बोर्डे यांनी सांगितले आहे की, मी नम्रपणे तक्रार निवेदन सादर करतो कि चिखली नगर परिषदेमध्ये २०१६ ते २०२१ यादरम्यान कोट्यवधी रुपयांचे कामे झालेली आहेत. सदर कामे हे वेगवेगळ्या योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहेत, परंतु काही ठिकाणी सदर कामे ही न करताच कोट्यवधी रुपयांच्या बिल संबंधित ठेकेदार, इंजिनीयर व मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी संगनमताने काढलेले आहे. तर काही ठिकाणी अर्धवट रस्ता, नाली बांधकामे, बगीचा सौंदर्यीकरण करण्यात येऊन त्या ठिकाणचे सुद्धा कोट्यवधी रुपयांचा घोळ केला आहे. बऱ्याच ठिकाणी तर एकाच कामाचे दोन वेगवेगळ्या योजनेतून बिले काढण्यात आली असल्याचेही तक्रारात नमूद आहे.
यावेळी मुख्याधिकारी अभिजित वायकोस आणि जेई यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत सांगितले आहे की, यांनी आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन शासन निर्णयाला आपल्या पायदळी तुडवून चिखली शहरातील अनेक नगरसेवकांचे ग्रीन झोन स्वतःच्या फायद्यासाठी उठून त्या ठिकाणी लेआउट, अकृषक परवाना देऊन नागरिकांच्या हक्काच्या जागेवर एक प्रकारे अतिक्रमण केलेले आहे. एकाच भूखंडाचे दोन वेळा एन ए करून आपल्या अधिकाराचा गैरवापर सुद्धा केला आहे. सर्व साधारण सभेत ज्या नगर सेवकांचे ग्रीन झोन काढण्यासाठी विषय घेण्यात आला व ठरावर त्याच नगरसेविकांची स्वाक्षरी आहे. अशाप्रकारे शासन निर्णयांची पायमल्ली सुद्धा मुख्याधिकारी वायकोस यांनी केली असल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे.
तसेच नगरपालिका विरुद्ध चिखली जिनिंग हा भूखंड असा वाद जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा येथे सुरू असताना दि चिखली जिनिंग प्रेसिंग चिखलीला व्यावसायिक शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी एनओसी देणे प्रत्यक्ष बांधकाम करण्यासाठी परवानगी देणे हा प्रकार करून मुख्याधिकारी यांनी न्यायालयाची दिशाभूल याद्वारे केली असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीच्या शेवटी मयूर बोर्डे यांनी लिहिले आहे की, सादर केलेल्या तक्रारीतील कामांमध्ये भ्रष्टाचार झाला नसेल आणि मी केलेली तक्रार खोटी असल्याचे असे उघड झाल्यास आपण भर चौकात मला फासावर लटकविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला आदेश द्यावेत आणि जर संपूर्ण चौकशीअंती (त्रयस्थ शासकीय यंत्रणेकडून) ठेकेदार, इंजिनिअर, मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांचे संगनमत उघड झाल्यास संबंधित ठेकेदारांना कायमस्वरूपी ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांच्यावर शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी फौजदारी कारवाई करावी तसेच इंजिनिअर, मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्यावर फौजदारी कारवाई करावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत जेई, मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना तात्काळ निलंबित करावे, अन्यथा १ मे २०२१ रोजी मंत्रालयासमोर ध्वजारोहणाच्या दिवशी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. अन्यथा लोकशाही मार्गाने संपूर्ण चौकशी होईपर्यंत असंख्य नागरिकांसह आमरण उपोषण सुरू करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही सदर तक्रारीत बोंडे यांनी नमूद केले आहे.