नंदुरबार - पालकमंत्र्यांनी स्थानिक शिवसैनिकांशी संघर्ष करण्या ऐवजी जिल्हाविकासात अडथळे आणणारे प्रश्न सोडवण्यात लक्ष घालणे आवश्यक आहे. शिवसैनिक तुमचे दुष्मन नाहियेत. एकत्रित नीट काम केले तरच सरकार व्यवस्थित चालेल; या शब्दात शिवसेनेचे वरिष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी येथील पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे मंत्री ऍड.के.सी. पाडवी यांना उद्देशून वक्तव्य केले.
शिवसेनेचे उत्तरमहाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा वरिष्ठ नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज शुक्रवार दि.११ जून २०२१ रोजी शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर हिरा एक्झिक्यूटिव्ह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेच्या आधी झालेल्या बैठकीत नंदुरबार जिल्हा शिवसेनेतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या कार्यात येणार्या अडचणींवर चर्चा झाली. शिवाय जिल्ह्यात चाललेल्या शिवसेना विरुध्द कॉंग्रेस संघर्षाचे जोरदार पडसाद देखील उमटले. पालकमंत्री तथा कॉंग्रेसचे आदिवासी विकास मंत्री ऍड.के.सी.पाडवी यांनी चालवलेल्या कथित अडवणुकीविषयी उपस्थित पदाधिकार्यांनी जोरदार तक्रारी मांडल्या. या प्रसंगी कृषी मंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख बाळासाहेब थोरात, जिल्हाप्रमुख आमशा पाडवी आणि डॉ.विक्रांत मोरे, दीपक गवते अन्य उपस्थित होते.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना उत्तर महाराष्ट्र दौर्याविषयी माहिती देऊन सांगितले की, सरकारमधे आघाडी असली तरी स्थानिक स्तरावर पक्ष म्हणून स्वतंत्र भुमिका घ्यायला मुभा राहिल. नंदुरबार जिल्हा शिवसेनेसाठी महत्वाचा आहे. आमचे आमदार कसे निवडून येतील आणि पुढच्या अन्य निवडणुकीत काय करायचे, याचा निर्णय घेण्यासाठीच हे दौरे आहेत.
पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री ऍड.के.सी.पाडवी यांच्याविषयी संजय राऊत स्पष्टपणे म्हणाले की, या बैठकीत पक्षातील जवळपास सगळ्या पदाधिकार्यांनी रोष व्यक्त केला. महाविकास आघाडीचे पालकमंत्री असतांनाही ते शिवसैनिकांशी नीट वागत नाही, शिवसैनिकांची कामे होऊ देत नाहित, शिवसैनिकांना पाण्यात पहातात, अशा तक्रारी आहेत. शिवसैनिकांना उभं करू नका, असे पालकमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश असल्याचे म्हणतात. हे असे नाही चालणार, असे नमूद करून संजय राऊत पुढे अतिशय कणखर शब्दात म्हणाले की, आमच्यावर सत्तेचा अंमल चढत नाही. मंत्री कोणीही असले तरी आम्ही मनात आणलं की घुसायचं तर घुसतोच. शिवसैनिक तुमचे दुष्मन नाहियेत. एकत्रित काम केले तरच सरकार व्यवस्थित चालेल. तथापि, के.सी.पाडवी हे सहकारी पक्षातील कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवू, असे संजय राऊत म्हणाले. विधानसभा निवडणुकीत जिल्हाप्रमुख आमशा पाडवी हे मंत्री केसी यांच्याविरुध्द लढले होते. ८० हजार मते तेव्हा आमशा पाडवींना मिळाली होती. त्या ८० हजार मतांचा आदर मंत्री केसी यांनी राखला पाहिजे. पुढच्या वेळी बघू काय करायचे ते. परंतु तुम्ही आमच्या नेत्यांना अपमानास्पद वागणूक देत असाल तर लक्षात घ्या मग या सत्तेचा उपयोग काय? अशी भावना शिवसैनिकात बळावतेय. त्यातून स्थानिक पातळीवर संघर्ष निर्माण होतो. तो संघर्ष होऊ नये; ही अपेक्षा, असेही संजय राऊत म्हणाले. जिल्ह्यातील मुलभूत प्रश्न सोडविण्यात महाविकास आघाडी सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आणून देताच राऊत यांनी सांगितले की, जिल्ह्याचे अनेक मुलभूत प्रलंबित आहेत तरी ती जबाबदारी पालकमंत्र्यांची आहे. पालकमंत्र्यांनी स्थानिक शिवसैनिकांशी संघर्ष करण्या ऐवजी विकासात अडथळे आणणारे तसले प्रश्न सोडवण्यात लक्ष घालणे आवश्यक आहे. ज्या ताकदीने शिवसैनिकांशी ते संघर्ष करतात त्या ताकदीने इकडले प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सरकारशी संघर्ष करावा, आम्ही तुमच्या सोबत राहू, असेही शेवटी राऊत म्हणाले.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333