नंदुरबार - जिल्हयातील धडगाव व तळोदा तालुक्यात भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. चालू वर्षातील ही दुसरी घटना असल्यामुळे सरदार सरोवर धरण आणि त्या लगतच्या नंदुरबार जिल्ह्यातील वाढती भु कंपने चर्चेचा विषय बनला असून त्याकडे अभ्यासकांचे लक्ष वेधले गेले आहे.
अधिक माहिती अशी की शनिवार दि.7 ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे पाच वाजता अक्राणी तालुक्यातील उम्राणी बु, उम्राणी खूर्द, सूर्यपूर, होडीपाडा, आमला, आचपा, राडीकमल, तळोदा तालुक्यातील बोरद, खरखड, प्रतापपूर, तहावद भागात दोन सेकंद भुकंपाचे धक्के जाणवले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. याविषयी गांधीनगर येथील संस्थान भूकंपशास्त्रीय संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, शनिवार दिनांक 7 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी
4:45 वाजता बसलेला हा धक्का 13.5 किमी खोलवर होता. हे ठिकाण नर्मदा नदीवरील महाकाय धरण सरदार सरोवर पासून 56 किलोमीटर अंतरावर आहे. विशेष असे की, आठ महिन्यापूर्वी मध्यप्रदेशात दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी भुकंपाचे दोनदा धक्के बसले होते. सीमेलगत महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुकाही त्याचवेळी हादरला होता. नर्मदा नदीवरील महाकाय सरदार सरोवर धरणापासून 99 किमि अंतरावर त्या भुकंप लहरींचे केंद्र असल्याचे इन्स्टिट्यूट ऑफ सेस्मालॉजिकल रिसर्चला त्यावेळी आढळून आले होते. यामुळे सरदार सरोवर धरण आणि त्या लगतच्या नंदुरबार जिल्ह्यातील वाढती भु कंपने चर्चेचा विषय बनला असून त्याकडे अभ्यासकांचे लक्ष वेधले गेले आहे. आताही जे सौम्य धक्के बसले ते सरदार सरोवर धरणापासून अवघे 56 किलोमीटर अंतरावर आहेत.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333