सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
नंदुरबार- कोरोना महामारी याचा प्रादुर्भाव मुंबई येथे अधिक असतांना नंदुरबार आगारातून काही बस आणि ६४ चालक वाहक मुबई बेस्टच्या ड्युटीसाठी १० दिवसासाठी गेले होते ते मुबई येथून परत आल्यावर त्यांची कोरोना टेस्ट न करता त्यांना लगेच पुढचा ड्युट्या लावण्यात जात आहे. आलेल्या चालक वाहकपैकी कोणीही संक्रमित असू शकतो म्हणून पुढे हे संक्रमण वाढण्याची शक्यता लक्षात घेता मुबई बेस्टच्या ड्युटीवरून नंदूरबार आगारात वाहक चालक आल्यावर कोविड-19 ची तपासणी करावी तसेच कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जावी अशी मागणी हिंदु सेवा सहाय्य समितीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी तसेच आगार प्रमुखांना केली आहे.
भारतातही कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असे तज्ञांनी अंदाज वर्तविला आहे. एसटी महामंडळाने नंदुरबार आगारातील बस चालक वाहक यांना आगारातील गाड्या घेऊन मुंबई बेस्ट सेवेसाठी मुंबई या ठिकाणी दहा दिवसा च्या ड्युटीसाठी पाठवतआहे. यात एका शिफ्टमध्ये ६४ चालक आणि वाहक यांना बोलविले जाते. दहा दिवसाची ड्युटी करून हे चालक वाहक परत नंदुरबार डेपोमध्ये येतात. त्यांची आरोग्य तपासणी न होता स्थानिक स्तरावर पुन्हा ड्युट्या सुरू होतात. मुंबईमध्ये राज्यातील सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. अशा ठिकाणाहून ड्युटी करून परत आल्यावर नंदुरबार आगारातील वाहक चालक यांची तपासणी होणे आवश्यक आहे परंतु तसे न होता त्यांना ड्युटी दिली जात आहे आलेल्या वाहक चालकापैकी कोणा एकला जरी कोरोना संसर्ग झाला असेल तर नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू शकतो ही बाब लक्षात घेता मुंबई बेस्ट साठी जे वाहक-चालक ड्युटी करून परत नंदुरबार आगारांमध्ये येत आहेत त्यांची कोरोनाची टेस्ट लागलीच करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी आणि त्यांना कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जावी अश्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधिर खांदे तसेच आगार प्रमुख मनोज पवार यांना हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक जितेंद्र राजपूत, मयुर चौधरी, डॉ. नरेंद्र पाटील यांनी केली आहे.