आपल्या जिल्ह्याची क्षमता लक्षात घेऊन, विविध कौशल्याचा उपयोग करून नवीन उद्योग उभे करून लोकांना रोजगार मिळवून देणे गरजेचे आहे. जोपर्यंत लोकांना रोजगार मिळणार नाही, तोपर्यंत गरिबी आणि भूकमरी संपणार नाही व स्वाभिमानाने जगता येणार नाही. अनेक योजना आणून रोजगार निर्माण कसा करता येईल यासाठी भंडारा-गोंदियातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भंडारा गोंदिया जिल्ह्यात व्यवसायाच्या संधी या विषयावर ते जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. याप्रसंगी खा. सुनील मेंढे व अन्य अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. भंडारा गोंदिया या जिल्ह्यांचा विकास व्हावा अशी भावना व्यक्त करण्यात आली. पण विकास म्हणजे काय याबद्दल सुस्पष्टता असणे आवश्यक असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- गरिबी, भूकमरी व बेरोजगारी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. उद्योग क्षेत्र, शेती क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आली आणि रोजगार उपलब्ध झाला तरच विकास होईल. जिल्हाश: स्थिती वेगळी आहे. म्हणूनच जिल्ह्याची क्षमता ओळखून लहान लहान उद्योगांचे क्लस्टर तयार झाले पाहिजे. या भागातील प्रमुख पीक असलेल्या धानापासून काय निर्माण होऊ शकते, याचा विचार होऊन, तसे उद्योग सुरु झाले पाहिजे. तांदळाचा पुरेसा साठ़ा असल्यामुळे त्याऐवजी आता कोणते पीक घेता येईल? बाजाराची मागणी काय ते पीक आणि त्यापासून तंत्रज्ञान आणि कौशल्याचा वापर करून उद्योगांचे क्लस्टर तयार करावे लागतील, असेही ना. गडकरी म्हणाले.
या दोन्ही जिल्ह्यात खनिज संपत्ती आहे. त्यावर आधारित उद्योग सुरु व्हावेत. या प्रक्रियेला गती मिळाली पाहिजे असे सांगून ना. गडकरी म्हणाले- विविध उद्योगांचे समूह तयार करण्यास या भागात भरपूर वाव आहे. गूळ, उदबत्तीच्या काड्या, मध, बांबू, नीरा, मोह या उद्योगांच्या समूहातून महिलांना रोजगार उपलब्ध होईल. तांदळापासून इथेनॉल तयार झाल्यानंतर उरलेल्या पेस्टमधून पशुखाद्य तयार करता येईल. दूध उत्पादनावरील खर्च कमी करून खवा तयार करून त्याचे क्लस्टर तयार करणे. थोडक्यात या भागात जो कच्चा माल अधिक उपलब्ध आहे, त्या आधारावर नवीन उद्योगांची निर्मिती व त्यातून रोजगार निर्मिती हे ध्येय असले पाहिजे, असेही ना. गडकरी म्हणाले.
पर्यटनासाठी खूप वाव या जिल्ह्यांमध्ये असून पर्यटक पर्यटनासाठी येतील, अशी अनेक स्थळे आहेत. या स्थळांच्या विकासाचा एक आराखडा तयार क़रून त्या दृष्टीने नियोजन झाले पाहिजे असे सांगून ना. गडकरी म्हणाले- गोंदिया बडनेरा, नरखेड चंद्रपूर, नरखंड वडसा अशी मेट्रो सुरु करण्यात येणार आहे. यामुळे दीड तासात गोंदियाला पोचता येईल. गोंदिया व्यक्ती नागपुरात व नागपुरातील व्यक्ती गोंदियात नोकरीसाठी जाणे-येणे करू शकेल. पाणी, ऊर्जा, वाहतूक आणि संवाद या गोष्टींचा विकास झाला तर आपल्या क्षेत्राचाही विकास होईल., याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले