लातूर: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येथील प्रा. विशाल लामतुरे लिखित ‘मेरा भारत है तू सबसे बडा’ या देशभक्तिपर गीताचे लोकार्पण सोशल मीडियावर करण्यात आले. हे गीत पाहण्यास नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
भारतातील एकता, विविधता, ऐक्य या गीतातून प्रकर्षाने दिसून येते. भारत हा जगात सर्वश्रेष्ठ देश असल्याचा संदेश या गीतातून प्रा. विशाल लामतुरे यांनी दिला आहे. या गीताला दिनेश मांदळे यांनी संगीतबद्ध केले आहे. अजय अजनीकर व दिनेश मांदळे यांनी गायलेले हे गीत तरुणांमध्ये देशभक्ती जागृत करण्याचे साधन ठरू शकेल, असे मत गीताचे गीतकार प्रा. लामतुरे यांनी व्यक्त केले. या गीताचे छायाचित्रण येथील छायाचित्रकार ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी केले आहे. या चारही कलाकारांनी साकारलेल्या या देशभक्तिपर गीताचे स्वातंत्र्यदिनी ऑनलाइन सोशल मीडियावर लोकार्पण करण्यात आले आहे. हे गीत पाहण्यासाठी दर्शकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त हे गीत जास्तीत जास्त युवक, युवती, नागरिकांनी श्रवण करावे, असे आवाहन प्रा. लामतुरे, अजय अजनीकर, दिनेश मांदळे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्यासह दीपरत्न निलंगेकर, श्रीराम जाधव, विनोद कांबळे, प्रा. राजाराम जाधव, बालाजी सूळ, कलारंग प्रतिष्ठान, क्रिमा क्रिएशन, रुद्र फिल्म, त्रिशरण डिजिटल यांनी केले आहे.