नागपूर, 21 फेब्रुवारी
कोविड-19 च्या काळात समाजातील अनेकांना विविध संकटांचा सामना करावा लागला. लोकांमध्ये भीती आणि नैराश्य निर्माण झाले. अशा वेळी सकारात्मकता आणि लोकांमध्ये आत्मविश्वास जागवणे महत्त्वाचे होते. कोविडचे आलेले हे संकटही निघून जाईल, असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
चैताली बांगरे लिखित ‘द 2020 क्वारंटाईम’ या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी ना. गडकरी बोलत होते. कोविडमुळे अनेक व्यापार, उद्योग बंद झाले. नियमित होणारे व्यवहार थांबले. समाजातील गरीब, सामान्य नागरिकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- मी स्वत: कोविडचा अनुभव घेतला आहे. आपल्याला कोरोनासोबत जीवन जगण्याची कला विकसित करावी लागेल. सकारात्मकता आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर हे युध्द आपण जिंकूच. मात्र या आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
कोविड-19 च्या काळात डॉक्टर, पोलिस, सुरक्षा कर्मचारी, सफाई कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी खूप परिश्रम घेऊन समाजातील अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- सामाजिक जबाबदारी ही आमच्या समाजाची विशेषत: आहे. या पुस्तकामुळे अनेकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.