जळगाव आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागांत निम्मा पावसाळा संपत आला तरी पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. खानदेशात दुष्काळाचे विदारक असे चित्र निर्माण झाले आहे. अनेक गावांत आतापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना १० ते १५ दिवसांनी पाणी मिळत आहे. या स्थितीची गांभीर्याने दखल घेत खानदेशात तातडीने कृत्रिम पाऊस पाडावा, अशी मागणी आमदार जयकुमार रावल यांनी केली.
याबाबत आमदार रावल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. की खानदेशातील सर्व जिल्ह्यांत २० दिवसांपासून ढगाळ वातावरण असले, तरी कुठेही पाऊस पडलेला नाही. निम्मा
पावसाळा संपत आला, तरी पुरेसा पाऊस नसल्याने खरीप पिके कोमेजू लागली आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. खानदेशातील बहुतांश प्रकल्पांतील जलसाठा दिवसेंदिवस घटत आहे. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करूनही नुकसान सोसावे लागले आहे. यामुळे सरकारने तातडीने दुष्काळी उपाययोजना सुरू कराव्यात, सध्या ढगाळ वातावरण कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी अतिशय पोषक असून, दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार रावल यांनी केली.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333