मुंबई: आमच्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकसमान आहेत. आम्ही कोणाला झुकते माप देणार नाही आणि कोणावर अन्यायही होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम दिली. तसेच २०१९ च्या निवडणुकीत ६१% मतदान महाराष्ट्रात झाले, यावेळी ही टक्केवारी किमान ७५ टक्क्यांपर्यंत जावी असा प्रयत्न आहे, असे ते यावेळी म्हणाले.
निवडणूक जाहीर होताच अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. प्रत्येक तक्रारीची आम्ही शहानिशा करतो. कोणत्याही राजकीय पक्षाने मग ते सत्तेत असोत वा नसोत, आयोगाला गृहीत धरू नये. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यास आम्ही बांधिल आहोत आणि त्यासाठी जेजे करता येईल ते केले जाईल. राजकीय पक्ष पाहून वागू नका, आचारसंहितेची अंमलबजावणी झालीच पाहिजे, आदेश धुडकावणारे आयोगाच्या रडारवर असतील, असा इशारा चोकलिंगम यांनी दिला.