(योगेश शर्मा)
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून त्यात चिखली तालुक्याने आपले वर्चस्व राखले आहे. प्रशासनाने संचारबंदीचे नियम जिल्हावासीयांना घालून दिलेत आणि नवीन आदेशानुसार शनिवारी संध्याकाळ पासून सोमवार सकाळ पर्यंत संपूर्ण दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देत संचारबंदी अधिक कडक करण्यात आली आहे. या नियमांतच लग्न समारंभात वर-वधुसह दोन्ही कडचे मिळुन केवळ ५० लोकांनाच लग्नात उपस्थित राहण्याची परवानगी आहे आणि त्यातही तहसीलदार यांची परवानगी घेणे आवश्यक असतांना देखील ग्रामीण भागात मात्र सारे नियम धाब्यावर बसवून थाटात लग्न समारंभ संपन्न होत असून हजारोच्या संख्येने लोक यात सहभागी होत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
चिखली तालुक्यातील आंचरवाडी येथे रविवार दिनांक ७ मार्च रोजी एक मोठा विवाह सोहळा पार पडला होता. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कोविड-१९ बद्दल काढलेल्या आदेशाची पायमल्ली करतांना मोठ्या थाटात हा विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे गावाची जबाबदारी असणारे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य देखील या विवाह सोहळ्यात संमिलीत होते. पंचक्रोशीत या मोठ्या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा होत असतांना, मात्र स्थानिक ग्राम सेवक, पोलीस पाटील, सरपंच, यांनी प्रशासनाला या विवाह सोहल्याबद्दल कोणतीही तक्रार न करता एका प्रकारे आपल्या पदाचा दुरुपयोग केला असल्याची सुद्धा चर्चा जोरदार रंगत आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी संचारबंदीचे नियम तोडतांना जर कोणी आढळून आला तर त्याच्यावर कारवाही होते. मात्र ग्रामीण भागात सर्रासपणे सुशिक्षित लोक या गंभीर परिस्थितीला पडद्याआड करत नियम मोडीत काढत आपले कार्य पार पडतांना दिसून येत आहेत. तर एरव्ही गावात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती वरिष्ठ स्तरांवर देण्याची जबाबदारी ज्या लोकांवर असते, ते गावाचे पोलीस पाटील आणि ग्राम सेवक यांनी सुद्धा यावेळी आपले कर्तव्य न निभवता ७ मार्च २०२१ रोजी गावात संपन्न झालेल्या विवाह सोहळ्याला जणू मूक संमती देत प्रशासनाच्या उद्देशाला खो देण्याचा प्रकार करत आहेत.
चिखली तालुक्यातील आंचरवाडी येथे संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती वरिष्ठ स्तरावर जाणीवपूर्वक न पाठवणारे हे अधिकारी, पदाधिकारी यांचेवरच अगोदर कारवाही करावी, जे नियमांचा उल्लंघन करत अश्या सोहळ्याला मूक परवानगी देत शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत लोकांच्या जीविताशी खेळत आहे..
आता बघणे हे आहे की, स्थानिक प्रशासन यावर काय कारवाई करतील ते..!