लातूर : लातूर मनपा अंतर्गत सिग्नल कैम्प भागातील गजानन नगरात बालवाडीसाठी आरक्षित भूखंड विक्री केला जात होता. ही बाब लक्षात येताच गजानन नगर भागातील जागरूक नागरिकांनी मनपाकडे तक्रार करून तो हाणून पाडला.
याबाबत माहिती अशी की, गजानन नगर (कन्हेरी गावठाण) येथील सर्वे नंबर ३७, ३८ व ३९ मधील जागा बालवाडीसाठी मनपाने आरक्षित केली होती. परंतु विष्णुदास अग्रवाल व वरूण अग्रवाल यांनी ही जागा आपण खरेदी केल्याचे भासवून त्रयस्थ व्यक्तीस विक्री केली होती. त्यासाठी मनपाकडून फेरफार करून घेऊन त्याला आर.८/४९५/८/१ असा घर क्रमांकही देण्यात आला होता. ही बाब संतोष ठाकूर यांच्यासह संतोष डोणगापुरे, दिनेश भागवत, विजय शेटे, दत्तात्रय इंगळे, अनंत गायकवाड, अरविंद माने, नरेंद्र गटागट, काशिनाथ डोणगापुरे, प्रेमचंद जगजीवन व परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन लक्षात आणून दिली होती.
याप्रकरणी आयुक्तांनी दोन वेळा सुनावणी घेतली. ही जागा ज्या कारणासाठी आरक्षित आहे त्याच कारणासाठी वापरावी, असा आदेश आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे आरक्षित जागेचे भूखंड पाडून त्याची विक्री करण्याचा डाव संबंधितांवर उलटला आहे.
संतोष ठाकूर व या परिसरातील नागरिकांनी जागरूकपणे मनपाला ही बाब निदर्शनास आणून दिल्यामुळेच हे शक्य झाले. यामुळे बालवाडीसाठी आरक्षित असणारी जागा त्याच कारणासाठी कायम राहिली.