ओबीसी समाजाचा विश्वासघात करणाऱ्या आघाडी सरकार विरोधात भाजपा करणार जिल्हाभर आंदोलन
प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजु पाटील राजे यांची पत्रकार परिषदेत माहीती
वाशिम : ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजु पाटील राजे यांनी मंगळवारी केली. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही राजे यांनी यावेळी केली केली.
स्थानिक जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राजु पाटील राजे बोलत होते. यावेळी जिल्हा महामंत्रीद्वय नागेश घोपे , शाम बढे,ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बालुभाऊ मुरकुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश मलिक, गजानन लांडगे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना राजे म्हणाले की, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे.
सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो आहे. विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा, असेही त्यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही.
बॉक्स
पवार बोले, निवडणूक आयोग हाले
ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणूका होवू नये अशी भाजपाची भूमिका असतांना महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल म्हणून ओळखल्या जाणारे शरदचंद्र पवार बोलले होते की रद्द झालेल्या जागा अधिक काळ रिक्त ठेवता येणार नाही. त्यानंतर लगेच आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम पवारांसह आघाडी सरकारने केले असल्याचे राजु पाटील म्हणाले.
राष्ट्रवादीची घोषणा धुळफेक करणारी
वाशिमसह पाच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या उमेदवारांचे नामांकण अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार अगोदरच पार पडली आहे. भाजपाने जय- पराजयाची पर्वा न करता सर्व जागांवर ओबीसी प्रवर्गातीलच उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादीला आता उपरती झाली असून त्यांनी ओबीसी उमेदवार देण्याचे सुतोवाच केले आहे. वास्तविक नामांकण अगोदरच दाखल झालेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची ही घोषणा धूळफेक करणारी म्हणावी लागेल असेही राजे यावेळी म्हणाले.
आज जिल्हाभर रास्तारोको
ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे 15 सप्टेंबर रोजी जिल्हाभर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. सहाही तालुका मुख्यालयी सदर आंदोलन केले जाईल.असेही राजे यांनी यावेळी सांगितले.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333