अनभिषिक्त गझल सम्राट सुरेश भट..
मराठी गझलेला सुवर्णयुगात नेण्याचे श्रेय सुरेश भटांचे उर्दु शायरीच्या लोकप्रियतेला धक्का न लावता मराठी गझलेचे स्वतंत्र विश्व निर्माण केले ते भटांनी.
पुराणकाळात सम्राट हा शब्द फारसा वापरात नसल्याचे जाणवते. रघुवंशातील सगळे ‘सत्ताकारी ‘राजा’ म्हटले गेले आहेत. सम्राट दशरथ कुठेही वाचले नाही. इतिहासकाळात परम प्राप्ती, सार्वभौम सत्ता असलेले शासक सम्राट ह्या बिरूदाने भूषविले गेले. सम्राट अशोक सम्राट चंद्रगुप्त मौर्य ही नाव सर्वांनी ऐकलेली आहेत. ह्या सम्राटांचे शासनकाल देशाचे सुवर्णयुग ठरले होते. देश वैभवाच्या शिखरावर होता.
मराठी गझलेला सुवर्णयुगात नेण्याचे श्रेय सुरेश भटांचे उर्दु शायरीच्या लोकप्रियतेला धक्का न लावता मराठी गझलेचे स्वतंत्र विश्व निर्माण केले ते भटांनी. त्यांच्या आधी अनेक कवींनी गझल लिहिण्याचा प्रयत्न केला. मराठीत गझल निर्मितीचे स्वप्न त्याच्याआधी अनेक कवींनी रचनाकारांनी पाहिले ते साकार केले सुरेश भटांनी. माधव ज्युलियन हयांच्या सारख्या शब्दशिल्पिंनी बीजारोपण केले व भटांनी त्याचा महावृक्ष केला. गझलेच्या साम्राज्यांची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. त्या साम्राज्यांला प्रत्यक्षात आणले, प्रस्थापित केले, सशक्त बनविले ते भटांनी. त्यांच्या हयातीतले सगळे गझलकार त्यांनी प्रसिध्द केलेली गझलेची बाराखडी वाचुनच लिहिते झालेत. प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयी अपार आदर आणि प्रेम असे हे गझलेचे साम्राज्य आणि ह्या स्वनिर्मित साम्राज्याचे ते सम्राट. माणुसकीचे नाते जपणारा, प्रत्येकाशी आत्मीयतेने वागणारा हा औसम्राट लौकिक अर्थाने सम्राट नव्हताच. खोलीतील कॉट हे त्याचे सिंहासन आणि लेखणीतून झरणारे रत्न-माणकासारखे बहुमोल शब्द हेच त्याचे वैभव. ते म्हणतात तेच खरे -
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा।
खरोखर भट असेच होते. नवोदितांना सकारात्मक मार्गदर्शन करणारे, लौकिक जीवनाच्या मर्यादा सांभाळणारे, व्यावहारिक जीवन जगणारे, दलितांना, वंचितांना मदत करणारे, स्वतंत्र जीवननिष्ठा जपणारे, गझलेसाठी मैफली भरवणारे, बहारदार आवाजाने मैफल रंगवणारे सुरेश भट बहुआयामी, अफलातून व्यक्तीमत्व. माझा परिचय झाला तो गझलेमुळेच. नागपूर पत्रिका हे दैनिक सप्तरंग नावाची पुरवणी काढत होते. त्यात रंगतरंग नावाचे निवडक गझलांचे सदर सुरेश भट चालवत होते. आवाहनानुसार मी रचना पाठविल्या. पुण्याच्या संगीता जोशी आणि मी,आमच्या रचना आणि फोटोसह एकाच पानावर झळकलो. दुसऱ्या आठवडयात दुसरी रचनाही आली. शाळेची नोकरी आणि घरची सगळी जबाबदारी या चक्रात माझी तत्परता अडकली. भटांनी पोस्टाने ‘बाराखडी’ पाठविली. फोन नसल्याने पोच दिली गेली नाही. त्यांच्या हस्ताक्षरातले पत्र आले. छान स्वच्छ अक्षरातले ते कार्ड मी अनेकदा वाचले. लिहिले होते - ‘तुमच्यात गझल लिहिण्याची क्षमता आहे. तुम्ही लिहा. योग्य वाटल्यास मला भेटावे.’ ‘योग्य वाटल्यास’ या शब्दाने मी पार गोंधळून गेले. लिहिणारी व्यक्ती चिडली आहे हे जाणवत होते. जायचे तर एक-दोन रचना सोबत नेणे गरजेचे होते. देवदर्शनाला रिकाम्या हातांनी कसे जायचे? सम्राटासाठी नजराणा घेतल्याशिवाय कसे जायचे? अखेर सगळी सिध्दता करून, शाळा आटोपून संध्याकाळी त्यांच्या राहत्या धंतोलीच्या घरी गेले. मनात धास्ती होतीच.खोलीच्या दारात उभी झाले.त्यांनी काहीशा आश्चर्याने आणि आनंदाने स्वागत केले. मनाने साक्ष दिली हा केवळ गझलेचा सम्राट नाही,हा माणसांचा सम्राट आहे. चहा पाण्याचे उपचार तिथे अनाठायीच ठरले असते. सरळ प्रश्न केला-‘काही लिहिता आहात की नाही?’ शब्दांना आपलेपणासोबत प्रेरणेची वेगळीच धार होती. लिहून नेलेल्या दोन्ही रचना त्यांना ऐकविल्या, खूष झाले व एक सूचना ही केली. आता नवीन-नवीन वृत्तांचा अभ्यास करा, त्यामध्ये रचना करा. शालेय जीवननंतर गुरूचे ऐकण्याचा हा प्रसंग. गौरवर्ण अधिकच सतेज वाटला. प्रकाश देतो म्हणूनच सूर्य तेजोनिधी ठरले. जो इतरांना वैभव संपन्न करतो तो खरा सम्राट.
त्यानंतर मी अनेकदा त्यांच्याकडे गेले. ते गझलेतून दांभिकांना शिव्या देत होते. प्रत्यक्षात ते तो विषय टाळायचे. राजकारणाच्या ते दूरच होते. प्रांजळ मनाचा माणूस राजकारण करू शकत नाही हे सुदैव की दुर्देव? ह्या जगाची सगळीच रीत उफराटी ‘पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार’ असे हे व्यवहारी जग. ह्या जगात नटसम्राटांची शोकांतिका सहज घडू शकते. पण सुरेश भटांच्या लेखणीने दुर्देवाला पार मागे टाकले राजसम्राटांचे वैभव तसेही नश्वर. शब्दांचे, ग्रंथांचे वैभव अनश्वर.अक्षर वैभवाचे धनी होते सुरेश भट. देशोदेशीचा रचनाकाराची त्यांना भरपूर माहिती होती. कवितेचे सगळे प्रकार त्यांनी स्विकारले लिहिले. पण केंद्रस्थानी होती गझल ते ही प्रवास करू शकले असते. प्रत्येक प्रांताच्या मराठी माणसांना गझल ऐकवू शकले असते तर मराठी गझल महाराष्ट्राबाहेर ही बहरली असती, राष्ट्रव्यापी झाली असती. साधन संपन्न गझलप्रेमींनी त्यांना परदेशवारी घडविली असती. तर मराठी गझलसम्राटांची सार्वभौम सत्तानिर्माण होऊ शकली असती. दुसऱ्यांला उंच उठवतांना आपण ही उंच होतो आणि खाली पाडतांना आपण ही खाली जातो हे जीवनसत्य जेंव्हा नाकारले जाते तेंव्हा अशीच सार्वजनिक हानी होते. ह्या सगळया प्रतिकूल अनुभवामुळे भट म्हणायचे - जीवना तू तसा, मी असा.
हा ‘मी’ कधी बदलला नाही. अन्यायाची मनस्वी चीड होती. सारा संघर्ष करण्याची तयारी होती. लहानपणी झालेल्या पक्षाघाताने एका पायातला जोर गेला पण वाणीला दुप्पट बळकटी आली. आईकडून ऐकलेल्या अभंगांचा, ओव्यांचा ओलावा मनात साठला होता. त्यांच्या प्रेरणेनेच ‘अंतरीचे सूर’ हा माझा गझल संग्रह मी प्रसिध्द केला आणि त्यांच्या शुभेच्छेने तो महाराष्ट्रातला पहिला गझल संग्रह ठरला.पण हा आनंदाचा क्षण त्यांच्यासमोर उगवला नाही ही मोठी खंत आहेच. अनेक वर्ष थांबलेले माझे गझल लेखन पुन्हा सुरू झाले. त्या संग्रहात मी अनेक नवीनवृत्तांचा प्रयोग केला आहे. ‘सुकामिनी’ वृत्तांत गझल सादर करण्याचे पहिले धाडस माझे. आता हया यशाचा आनंद होत नाही. दिवा विझलेल्या महालात उजेड कसा मिळणार?
सुरेश भटांच्या प्रत्येक गझल संग्रहाने जो आनंद दिला त्याला नावच नाही. पिढया घडविणाऱ्या गझलकारांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या हया सम्राटाला एखाद्या राजमुकुटाने अलंकृत करण्यात कोणती अडचण कळत नाही, 14 मार्च हा त्यांचा स्मृतिदिन मराठी गझलदिन म्हणून का घोषित करण्यात आला नाही? सम्राटाला कोणतीच मानवंदना न देण्याची ही कोणती मानवी रीत? म्हणूनच ते लिहून गेलेत-
सरणावर जातांना इतकेच मला कळले होते-
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ।
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प