नवी दिल्ली 05 मे: दारुची दुकाने सुरू केल्याने देशभर प्रचंड गर्दी उसळलेली बघायला मिळाली. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्ली सरकारने एक उपाय केला आहे. दारुवर तब्बल 70 टक्के जादा टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दारुची होम डिलेव्हरीही करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सोशल डिस्टेन्सिंगचं पालन कडकपणे करावं असं दिल्ली सरकारने म्हटलं आहे.
तर उत्तराखंडमधल्या नैनीताल इथं बर्फ पडत असतानाही कडाक्याच्या थंडीत उभं राहून लोकांनी दारु विकत घेतली. बर्फ पडत असतानाही लोक छत्री घेऊन रांगेत उभे राहिले. तर ज्यांच्याकडे छत्री नव्हती ते ओले तर उभे राहिले पण माघारी गेले नाहीत.
मुंबईतील मद्यप्रेमींना मात्र बुधवारपासून दारू मिळणार नाही. मुंबईसारख्या रेड झोनमध्ये दारूसाठी तळीरामांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका आहे. त्यामुळे उद्यापासून मुंबईत दारू विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश महापालिकेकडून देण्यात आला आहे.
सोमवारी दारूची दुकानं उघडताच मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली. यात सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला. त्यामुळे सोशल मीडियावरून आणि इतर नागरिकांकडून लोकांची गर्दी वाढली असल्याच्या अनेक तक्रारी आल्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात पालिकेकडून एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यात दीड महिन्यापासून अनावश्यक सेवांवर बंदी घालण्यात आली आहे.
देशात तिसऱ्या टप्प्यातला लॉकडाऊन संपायला आता काही दिवस राहिलेले असतानाच तेलंगणाने चवथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. राज्यातल्या लॉकडाऊन 29 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. तेलंगणात आज 11 नवीन रुग्ण सापडले असून राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या 1096 वर गेली आहे. चवथ्यांचा लॉकडाऊन वाढविणारं तेलंगणा हे पहिलच राज्य आहे.