मुजफ्फरनगर, 14 मे : देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसायांना टाळं लागलं. त्यामुळे रोजगार नसल्यानं मजूर आपल्या गावी परतत आहेत. याच दरम्यान रात्री उशिराच्या सुमारास एक मोठा भीषण अपघात झाला. पायी जाणाऱ्या मजुरांना एका बसनं चिरडल्याची धक्कादायक घटना मुजफ्फरनगर-सहारनपूर राज्याच्या महामार्गावर घडली आहे. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास 10 प्रवाशांना या बसनं चिडल्याची माहिती मिळाली. त्यापैकी 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण जखमी आहेत.
गंभीर जखमी असलेल्या 4 जणांवर मेरठ मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पंजाबहून आपल्या घरी पायी निघालेल्या मजुरांवर काळानं घाला घातला. या दुर्घटनेनंतर अंधाराचा फायदा घेऊन बस चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. मृतक आणि जखमी कामगार बिहार प्रांतातील गोपाळगंज जिल्ह्यातील आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबहून रात्री उशिरा मजुरांचा एक गट सहारनपूरमार्गे मुझफ्फरनगरकडे पायी प्रवास करत निघाला होता. घलौली चेकपोस्टपासून काही अंतरावर असलेल्या रोहाना टोल प्लाझाजवळ भरधाव येणाऱ्या बसनं या मजुरांना चिरडलं. घटनेनंतर बस घटनास्थळी सोडून चालक फरार झाला आहे. पोलिसांकडून या दुर्घटनेसंदर्भात चौकशी आणि फरार बस चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.