देशव्यापी लॉकडाऊनमुळे बंद असलेली प्रवासी रेल्वेसेवा उद्यापासून (मंगळवार) मर्यादित मार्गावर सुरू होणार आहे. त्यासाठीचे आरक्षण प्रवाशांना आज सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन करता येईल. पहिल्या टप्प्यात नवी दिल्लीहून मुंबई सेंट्रलसह देशभरातील 15 राजधानी मार्गावर रेल्वेच्या 30 फेऱ्या होतील, असे भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल, दिब्रुगढ, आगरतळा, हावडा, पाटणा, रांची, बिलासपूर, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळूरू, चेन्नई, थिरूवनंतपुरम, मडगाव, अहमदाबाद आणि जम्मू तावी या 15 मार्गावर पूर्ण क्षमतेने रेल्वेच्या फेऱ्या होणार आहेत. या सर्व रेल्वे वातानुकूलित असून, एका डब्यात पूर्ण क्षमतेने म्हणजेच 72 प्रवासी प्रवास करतील.
उद्यापासून सुरू होणाऱ्या 15 मार्गांवरील रेल्वेची वाहतूक सुरळीत झाल्यानंतर नवीन मार्गावर प्रवासी वाहतूक करण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेच प्रवाशांना प्रवासभाड्यात कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.