मुंबई: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे सरासरी ४८.६६ टक्के मतदान झाले आहे. अनेक ठिकाणी राजकीय आरोप - प्रत्यारोप, कुठे मतदार यादीत नाव नसल्याचा गोंधळ, कुठे मतदान यंत्रात बिघाड अशा गदारोळात महाराष्ट्रातील लोकसभेचे शेवटच्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले.
राज्यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत भिवंडी - ४८.८९ टक्के, धुळे - ४८.८१ टक्के, दिंडोरी - ५७.०६ टक्के, कल्याण - ४१.७० टक्के, मुंबई उत्तर - ४६.९१ टक्के, मुंबई उत्तर मध्य - ४७.३२ टक्के, मुंबई उत्तर पूर्व - ४८.६७ टक्के, मुंबई उत्तर पश्चिम - ४९.७९ टक्के, मुंबई दक्षिण - ४४.२२ टक्के, मुंबई दक्षिण मध्य - ४८.२६ टक्के, नाशिक - ५१.१६ टक्के, पालघर - ५४.३२ टक्के, ठाणे - ४५.३८ टक्के इतके मतदान झाले.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला मुंबईतील सहा मतदारसंघांत सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली. उपनगरातील काही मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने सुरू राहिल्याने लांबच्या - लांब रांगा लागल्या होत्या. मानखुर्द, मुलुंड आणि भांडुप येथे मतदान प्रक्रियेत तांत्रिक अडथळे आले होते, तर मानखुर्द येथील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आले होती. मतदान यंत्र तातडीने बदलण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.