जालना: लोकसभा निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असतांना, अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला गेले होते. यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या असून या गुपचूप भेटीमागील नेमकं कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मनोज जरांगे यांच्या भेटीला जाणार असल्याचा थांगपत्ता कोणालाही लागू न देता, जय पवार आज सकाळी मुंबईतून हेलिकॉप्टरने थेट छत्रपती संभाजीनगरला पोहोचले. तेथून कारने ते अंतरवाली सराटी येथे पोहोचले. याठिकाणी जय पवार यांनी अर्धा तास वाट पाहिल्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी त्यांची भेट झाली. यानंतर स्वागताचा कार्यक्रम पार पडला. जय पवार यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. मात्र या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.